राज्यातील राजकारणात मोठ्या हालचाली सुरू असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवार, ७ जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामांमुळे देशाचा विकास झाला आहे. मोदी यांनी राम मंदिराची उभारणी, कलम ३७० हे प्रश्न सोडवले. महिलांचा प्रश्न आणि देशाचा विकास हा मुख्य उद्देश ठेऊन मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपली भूमिका विकासाची आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकास होत आहे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचं म्हटलं आहे आणि शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा प्रवास उत्तम सुरू असल्याचंही त्या म्हणाल्या. त्यामुळेच त्यांच्यसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याच्या भावना नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट मांडल्या.
सुषमा अंधारे आल्यामुळे ठाकरे गटातील महिला नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे पक्षाची साथ सोडली का? या प्रश्नावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याची परिस्थिती नाही, असं म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंना टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
शिवसेनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अनेक जण स्वतःच्या पद्धतीने अर्थ लावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे जात आहे. त्यात राज्याचा वाटा असला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. तसेच त्यांनी यावेळी नीलम गोऱ्हे यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना महिलांसाठी मुक्तपणे काम करता येईल, असा विश्वास दिला. उद्धव ठाकरे यांनी आरोप करण्याऐवजी आत्मपरीक्षण करण्याची गरज असून ही वेळ का आली आहे? याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
शिवसेना आणि भाजप विचाराने एक आहे त्यामुळे नीलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित राहिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या भावना समजून घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हे ही वाचा:
राहुल गांधींना गुजरात उच्च न्यायालयाचा दणका; खासदारकी आठ वर्षांसाठी रद्दच!
पंतप्रधान संग्रहालयातून एका वर्षात मिळाला ६.८० कोटींचा घसघशीत महसूल
बुलढाणा बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत होता
इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; सहा गुन्हे दाखल
ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया
आमदार अनिल परब यांनी नीलम गोऱ्हे यांच्या पक्ष प्रवेशावर टीका करत म्हटलं की, “शिवसैनिकांच्या मेहनीतवर नीलम गोऱ्हे यांनी चार वेळा आमदारकी उपभोगली. याबद्दल त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. परंतु, ज्या शिवसैनिकांच्या जोरावर त्यांनी ही सगळी पदे उपभोगली, त्या शिवसैनिकांना हे पाहून किती यातना होत असतील, याचा विचार करावा.”
“आपल्याला काही मिळत नाही, म्हणून पक्ष सोडणारे भरपूर आहेत, असं असलं तरी पक्षाच्या वाईट दिवसात लाखो कार्यकर्ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. त्यामुळे असे संधीसाधू लोक गेले असतील, तर त्यांची जागा नक्कीच भरणार. सगळी पदं उपभोगल्यानंतर पक्षाला दगा देणं आणि वार करणं हे उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यांना शोभत नाही. त्यांना जी काही आश्वासनं मिळाली असतील किमान ती पूर्ण व्हावीत, एवढीच आमची अपेक्षा आहे. ना इकडच्या ना तिकडच्या अशी त्यांची अवस्था होऊ नये,” अशी टीका अनिल परब यांनी केली.







