33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरे यांच्या संघर्षाचा वारसा नेमका कोणाचा?

उद्धव ठाकरे यांच्या संघर्षाचा वारसा नेमका कोणाचा?

Google News Follow

Related

काळ कसोटीचा आलाय, पण काळाला सांगा हा वारसा संघर्षाचा आहे. दसरा मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्याच्या जाहीरातीसाठी कलानगरात लावलेले हे कटआऊट.

शिवसेना म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना म्हणजे संघर्ष असे एकेकाळी समीकरण होते. पण हे समीकरण शिवसेना प्रमुखांसोबत संपले. आता संघर्ष उरलाच असेल तर तो सोशल मीडियावरच्या ट्रोलर पुरता आणि अशा पोस्टर पुरता आहे.

उद्धव ठाकरे कोविडच्या काळात घरी बसून झोपा काढत होते असा हल्लाबोल भाजपा नेते विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाटील जे म्हणाले त्यात तथ्य आहे. कोविड महामारीच्या काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे घरी बसून होते. फेसबुक लाईव्हच्या पलिकडे त्यांनी फारसे काहीच केले नाही. शिवसेनाप्रमुख हयात असताना अशाप्रकारची टीका करण्याची कोणाची हिंमत नव्हती. परंतु, आता कोणीही यावं आणि टीका करून जावं अशी उद्धव ठाकरे यांची परीस्थिती झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या तोंडी संघर्षाची भाषा शोभत नाही.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकाळातही शिवसेना आणि भाजपा यांची युती होती. परंतु, सत्तेसाठी अंतर्गत संघर्षही होता. ही स्पर्धा सकस होती. जनमानसावर शिवसेनाप्रमुखांचे गारुड होते. भाजपा नेत्यांना ते मान्यही होते. शिवसेनेचे हिंदुत्व अधिक कडवट आहे, हे जनमानसात रुजवण्यात शिवसेनाप्रमुख यशस्वी झाले होते.

अमरनाथ यात्रेला धक्का लावण्याचा प्रयत्न कराल तर मुंबईहून हजसाठी एकही जहाज जाऊ देणार नाही, काश्मीरातील दहशतवाद्यांना असा दम भरणारे बाळासाहेब, पाकिस्तानविरुद्ध होणारा सामना रोखण्यासाठी वानखेडे स्टेडीयमची खेळपट्टी उखडून टाकणारे शिशीर शिंदे यांच्यासारखे शिवसैनिक असल्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व अधिक कडवट असल्याची भावना लोकांमध्ये अधिक घट्ट झाली होती. तुमच्या झेंड्यावरचा तो हिरवा डाग पुसून टाका, असे विधान बाळासाहेबांनी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत एका जाहीर सभेत केले होते आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता.

भाजपाचे नेते शिवसेनाप्रमुखांसमोर दबून असायचे ते अशाच रोखठोक पवित्र्यामुळे. मुस्लीमांच्या एकगठ्ठा मतांमुळे देशात तुष्टीकरणाचे राजकारण सुरू आहे. हे बंद करायचे असेल तर मुस्लीमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या, हे बाळासाहेबांचे वक्तव्य होते. सामनामध्ये असे आवाहन करणारा अग्रलेखही प्रसिद्ध झाला होता.

शिवसेनेची सत्तेसाठी भाजपाशी स्पर्धा होती ती हिंदुत्वाच्या मुद्यावरून. तुमचं हिंदुत्व अधिक कडवट की माझं, अशीही स्पर्धा होती. उद्धव ठाकरे यांच्या काळात भाजपाशी हिंदुत्वाच्या मुद्यावर असलेली ही सकस स्पर्धा संपली. त्याचे स्पर्धेचे रुपांतर ओंगळवाण्या सत्ता संघर्षात झाले. कडवट हिंदुत्व बाजूला ठेवून उद्धव ठाकरे गटाने केवळ आणि केवळ सत्तेसाठी संघर्ष सुरू केला.

सत्ता हाच निवडणुकीच्या राजकारणाचा केंद्र बिंदू असतो. त्यामुळे सत्तेचा विचार सोडून कोणतीही राजकीय पक्ष काम करीत नाही. परंतु, शिवसेनाप्रमुखांच्या ज्या वारशाबाबत उद्धव ठाकरे सांगतायत. तो वारसा हिंदुत्वाचे राजकारण करून सत्ता मिळवायचा आहे. उद्धव ठाकरे यांना मात्र फक्त सत्तेचे राजकारण करायचे आहे. त्यासाठी वेळ पडली तर त्यांची हिंदुत्वाला, हिंदुत्ववाद्यांना तिलांजली देण्याची तयारी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही बाब वारंवार उघड झाली. त्यामुळे फरक स्पष्ट आहे. शिवसेनाप्रमुखांचा वारसा हिंदुत्वासाठी संघर्षाचा होता. हिंदुत्वाचे महानायक, हिंदुत्वाची प्रतीके त्यांनी शिरोधार्य मानली होती. उद्धव ठाकरे यांचा संघर्ष हिंदुत्ववाद्यांशी सुरू आहे. ते भाजपाशी संघर्ष करतायत. ते एकनाथ शिंदे यांच्या गटाशी संघर्ष करतायत.

या संघर्षात उद्धव ठाकरे यांनी मित्र म्हणून ज्यांना सोबत घेतले आहे, ते नेमके कोण आहेत?

हिंदुत्वाच्या मुळावर उठलेले राजकीय पक्ष आज या संघर्षात उद्धव यांच्यासोबत आहेत. केरळमध्ये हिंदूविरोधी पास्टर जॉर्ज पोनय्या, वायनाडमध्ये भर रस्त्यात वासरू कापणारा रीजील मुक्कूटी यांच्यासोबत भारत जोडो यात्रा काढणारे राहुल गांधी त्यांच्यासोबत आहेत. महाराष्ट्रात जाती जातीत विष कालवणारे शरद पवार त्यांचे मार्गदर्शक बनले आहेत. हिंदूविरोधी वक्तव्य करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यासारख्या नेत्यांना पक्षात आयात केले जाते आहे.

हे ही वाचा:

आणि पंतप्रधान मोदींनी चालवली गाडी

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगेंचे पारडे जड

“5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडणार”

कांदिवलीत झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू

शिवसेनाप्रमुखांचा दसरा मेळावा हा विचारांचे सोने लुटण्यासाठी होता. हे विचार पवार आणि राहुल गांधींच्या प्रभावळीतले नव्हते. हे विचार हिंदुत्वाचे होते. उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळाले, पण त्यांच्या दसरा मेळाव्यात हिंदुत्वासाठी संघर्ष करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांचा विचार ऐकायला मिळेल याची काडीमात्र शक्यता नाही.

बंजारा समाजाचे सुनील महाराज यांनी दिलेला प्रसाद उद्धव ठाकरे यांनी खाल्ला नाही. आदित्य ठाकरे पंढरपूर येथील विठ्ठल मंदीराच्या गाभाऱ्यात गुदमरले, ही उदाहरणे संकष्टीच्या दिवसात मटण खाणाऱ्या सुप्रिया सुळे आणि मांसाहार केल्यामुळे मंदिरात दर्शन न घेता परत जाणाऱ्या शरद पवारांच्या उदाहरणापेक्षा वेगळी थोडीच आहेत.

वारसा हा विचारांचा असतो, वास्तूचा नसतो, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावलेला हा टोला. दसरा मेळाव्यालाही लागू होता. वारसा हा विचारांचा असतो, मैदानाचा नसतो. कधी शिवसैनिकांना वाघ म्हटलं जायचं, आता आदित्य ठाकरे यांना कोणी पेंग्विन म्हणत असेल तर त्याचा अभिमान वाटतो. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचा कितीही वारसा सांगितला तरी उद्धव गटाच्या शिवसेना मेळाव्यात, १९९३ मध्ये शिवसैनिकांनी दर्ग्याचे रक्षण केले, मुस्लीमांना आमचे हिंदुत्व कळले आहे, असे बुळबुळीत विचार ऐकायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा