भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांना मोलाचा सल्ला दिला आहे. उपांत्य फेरीत बंगालचा पराभव करून जम्मू-काश्मीर संघाने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
बीसीसीआयने आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शमी गोलंदाजांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. शमी म्हणाले, “स्विंग, लेंथ, वेगवान चेंडू कसा टाकायचा, कोणता चेंडू टाकायचा – हे सगळं विसरा. २२ गजांची पिच विसरा आणि फक्त स्टंप्सवर लक्ष केंद्रित करा. बाकी गोष्टींचा विचार करू नका. मैदानावर काय घडतंय याची चिंता सोडा.”
या व्हिडिओमध्ये शमी विशेषतः आकिब नबी डार याच्याशी संवाद साधताना दिसतात. जम्मू-काश्मीरला पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचवण्यात आकिबची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. बंगालविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने एकूण ९ बळी घेतले, तर उपांत्यपूर्व फेरीत मध्य प्रदेशविरुद्ध १२ बळींची कमाई केली होती.
उपांत्य सामन्यात बंगालने पहिल्या डावात ३२८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात जम्मू-काश्मीरने ३०२ धावा करत सामना रंगतदार ठेवला. अब्दुल समदने ८२ धावांची खेळी केली, तर कर्णधार पारस डोगराने ५८ धावांचे योगदान दिले.
दुसऱ्या डावात आकिब नबी आणि सुनील कुमार यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे बंगालचा डाव केवळ ९९ धावांत आटोपला. दोघांनी प्रत्येकी चार बळी घेतले. १२६ धावांचे लक्ष्य जम्मू-काश्मीरने ४ गडी गमावून सहज गाठले. वंशज शर्मा ४३ धावांवर नाबाद राहिला, तर अब्दुल समदने २७ चेंडूत ३० धावा केल्या.
आता अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीरसमोर मोठे आव्हान असले, तरी शमींच्या सल्ल्यामुळे संघाचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे.







