पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला केला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे.
भारतात पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुपर लीग (PSL) चं प्रसारण थांबवण्यात आलं होतं.आता भारतीय स्ट्राईकनंतर पाकिस्तानातच ही स्पर्धा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लाहौरमध्ये पाकिस्तानने आपत्कालीन स्थिती जाहीर केली असून या पार्श्वभूमीवर पीएसएल चे उर्वरित सामने रद्द होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानी सुपर लीगचे सामने रावलपिंडी, कराची, मुल्तान आणि लाहौर येथे नियोजित होते. 34 पैकी 25 सामने पार पडले असून, अजून 5 लीग सामने आणि त्यानंतर 4 नॉकआउट सामने बाकी आहेत.
पुढील 4 सामने रावलपिंडीमध्ये होणार होते. एक सामना मुल्तानमध्ये, तर नॉकआउट आणि अंतिम सामना लाहौरमध्ये होणार होता. या स्पर्धेचा अंतिम सामना 18 मे रोजी लाहौरमध्ये पार पडणार होता. पण आता सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पीएसएल स्पर्धा अडकण्याची शक्यता आहे.
लाहौरमध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर झाल्याने आणि भारताच्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू पीएसएलमधून माघार घेऊ शकतात.
ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, इंग्लंडचा जेम्स विंस, न्यूझीलंडचा टिम सायफर्ट आणि इतर अनेक खेळाडू पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात. जर हे खेळाडू माघार घेतले, तर पाकिस्तानची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होण्याची शक्यता आहे. आधीच असुरक्षिततेचा आरोप असलेल्या पाकिस्तानमध्ये आता क्रिकेटसुद्धा धोक्यात आला आहे.