दोन वेळचे ऑलिंपिक पदक विजेते नीरज चोप्रा यांनी उघड केलं आहे की, अनेक आंतरराष्ट्रीय भालाफेकपटू “नीरज चोप्रा क्लासिक” या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा २४ मे रोजी बेंगळुरूमध्ये होणार आहे.
ही स्पर्धा “एनसी क्लासिक” या नावाने ओळखली जाणार असून, वर्ल्ड अॅथलेटिक्सच्या ‘ए’ श्रेणीत समाविष्ट आहे. याचा अर्थ असा की, या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना उच्च दर्जाचे रँकिंग पॉइंट्स मिळतील, अगदी कॉन्टिनेंटल टूर गोल्ड स्पर्धेप्रमाणे.
नीरज चोप्राच्या नावाने भारतात प्रथमच अशा स्वरूपाची स्पर्धा आयोजित केली जात असून, यात जगभरातील टॉप महिला आणि पुरुष भालाफेकपटू सहभागी होणार आहेत.
जेएसडब्ल्यू आयोजित एका वर्च्युअल पत्रकार परिषदेत नीरजने सांगितले की, ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स (पॅरिस ऑलिंपिक कांस्य पदक विजेता व दोन वेळा विश्वविजेता) आणि केनियाचा ज्युलियस येगो (रिओ ऑलिंपिक रौप्य पदक विजेता व माजी जागतिक विजेता) भारतात येणार आहेत.
नीरज म्हणाला, “अँडरसन पीटर्स (ग्रेनेडा), ज्युलियस येगो (केनिया), कर्टिस थॉम्पसन (अमेरिका), थॉमस रोलर यांच्यासारखे खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत. काही नावं सांगितली आहेत, इतर लवकरच जाहीर करू. भारताकडूनही खेळाडू सहभागी होतील – मी रोहित यादवशी बोललो आहे.”
ही स्पर्धा वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप (१३ ते २१ सप्टेंबर, टोकियो) साठी पात्रता मिळवण्यासाठी एक महत्त्वाची संधी ठरणार आहे. मात्र नीरज आधीच पात्र ठरलेला आहे.
नीरज म्हणाला, “आपण किमान ४-५ भारतीय खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करतो आहोत. ही एक गोल्ड-लेव्हल स्पर्धा आहे, जिथे चांगल्या कामगिरीतून त्यांना रँकिंग पॉइंट्स मिळू शकतात – आणि त्यामुळे वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र होण्याची संधी मिळते.”
जेव्हा पाकिस्तानचा ऑलिंपिक विजेता अरशद नदीम याच्या सहभागी होण्याबाबत विचारणा झाली, तेव्हा नीरज म्हणाला, “आम्ही त्याला आमंत्रण दिलं आहे, पण अजूनही त्याच्याकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.”
सुरुवातीला ही स्पर्धा हरियाणाच्या पंचकुला येथील ताऊ देवी लाल स्टेडियममध्ये होणार होती. मात्र आता ती बेंगळुरूच्या श्री कांतिरावा स्टेडियममध्ये होणार आहे.
नीरज म्हणाला, “हरियाणामधल्या स्टेडियममध्ये प्रकाशाची सोय प्रसारणासाठी पुरेशी नव्हती. तिथे फक्त ६०० लक्स प्रकाश होता, पण आपल्याला त्यापेक्षा जास्त हवी होती आणि वेळही खूप कमी होता.”
त्याने पुढे सांगितले, “मी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी सकारात्मक पाठिंबा दिला.”