चेन्नई सुपर किंग्ज… एकेकाळी जी आयपीएलची बादशाह होती, आज २०२५ च्या हंगामात तिची अवस्था बघवत नाहीये. रुतुराज गायकवाड जखमी झाला आणि नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा ‘थलायवा’ महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावर आली. पण जणू नशिबाने साथ सोडली. काल रात्रीच्या सामन्यात सीएसकेला मुंबई इंडियन्सकडून ९ विकेट्सनी दारुण पराभव पत्करावा लागला – हा त्यांच्या इतिहासातला ‘तिसऱ्या क्रमांकाचा’ सर्वात मोठा पराभव ठरला आहे… आणि विशेष म्हणजे, तीनही वेळा त्यांना पराभूत करणारी टीम – मुंबई इंडियन्सच!
“सीएसके विरुद्ध एमआय” – ही केवळ मॅच नाही, हा एक ‘युद्ध’ असतो.
२०२५ हंगामाची सुरुवात सीएसकेने एमआयला हरवून केली होती. वाटलं, जुनं वैभव परत येईल. पण काल एमआयने तीच हिसकावून घेतली, तोच बदला घेतला.
२०२० मध्ये शारजाहवर १० विकेट्सनी,
२००८ ला वानखेडेवर ९ विकेट्सनी,
आणि आता पुन्हा २०२५ मध्ये ९ विकेट्सनी – सीएसकेवर मुंबई इंडियन्सचं वर्चस्व अधोरेखित झालं.
पण आकडे फसवतात… आणि इतिहासात दडलेली आहे दुसरी बाजू!
गेल्या ८ सामन्यांत ही एमआयची केवळ दुसरी विजय होती. मागील चार सामने सीएसकेने जिंकले होते. म्हणजे ‘रायव्हलरी’ अजूनही दोन्ही बाजूंनी तितकीच तीव्र आहे.
कालचा विजय एमआयसाठी सलग तिसरा होता – आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, रोहित शर्मा आता फॉर्मात येतोय!
दोन्ही संघांनी ८-८ सामने खेळलेत.
एमआयकडे ४ विजय, सीएसकेकडे केवळ २.
चेन्नईसाठी ‘अंधाराचे दिवस’ चालू आहेत… पण थलायवा अजून मैदानात आहे.
धोनीच्या शांत चेहऱ्यामागे असतो संयमाचा महासागर. पण आता वेळ आली आहे, जेव्हा सीएसकेला चमत्कार घडवावा लागेल. नाहीतर आयपीएलमधील हे यशस्वी पर्व संपत चाललंय, आणि फॅन्सच्या हृदयात एकच प्रश्न –
“धोनीला पुन्हा विजयी निरोप मिळेल का?”