भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात मुळ्लापूर येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेटला एक नवा आशादायी चेहरा मिळाला आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर येथील युवा डावखुरा फिरकीपटू मानव सुथार याने भारतीय कसोटी संघात पदार्पण करताच आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कर्णधार शुभमन गिलच्या हस्ते कसोटी पदार्पणाची कॅप स्वीकारताना मानवच्या डोळ्यांत आनंद आणि अभिमान स्पष्ट दिसत होता. भारताचा ३१९वा कसोटीपटू बनलेल्या मानवसाठी हा क्षण आयुष्यभराची आठवण ठरणारा होता. मानव सुथार याच्या शानदार खेळीने भारताने या कसोटीवर मजबूत पकड मिळवली आहे.
या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा सर्वात मोठा लाभ मानव सुथारला मिळाला. अनुभवी फिरकीपटूंच्या अनुपस्थितीत त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र दबावाला न जुमानता त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी करत संघाचा विश्वास सार्थ ठरवला. आजचा दिवस संपला तेव्हा अफगाणिस्तानचा संघ ५ बाद ११३ वर होता तर रेहमत शहा हा ४३ धावाकरुन अजूनही नाबाद आहे. भारताकडून नवोदित मानव सुथार याने ३ तर प्रसिद्ध कृष्णाने २ बळी बाद केले आहे. भारताने पहिल्या डावात गिल आणि राहुलच्या शतकाच्या जोरावर ८ बाद ५६४ धावा केल्या.
हे ही वाचा:
संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च सन्मान मेजर अभिलाषा बराक यांना प्रदान
मान्सूनचा वेग मंदावला; शेतकऱ्यांनो पेरणीची घाई टाळा
व्हाईट हाऊसला श्रीराम कृष्णन यांचा रामराम
आरे कॉलनीतला लँड जिहाद… लाखोंची वीजचोरी… जमिनीवर कब्जा
मानव सुथारने पदार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच षटकात विकेट घेत त्याने इतिहास रचला. भारतीय क्रिकेटमध्ये तब्बल पंचवीस वर्षांनंतर एखाद्या गोलंदाजाने पदार्पणाच्या पहिल्या षटकात विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. या कामगिरीनंतर मैदानावर त्याचे सहकारी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी त्याचे विशेष अभिनंदन केले. त्याच्या अचूक टप्प्यावर पडणाऱ्या चेंडूंसह प्रभावी फिरकीने अफगाणिस्तानच्या फलंदाजांना अडचणीत आणले.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत मानव सुथारने राष्ट्रीय निवडकर्त्यांचा विश्वास संपादन केला होता. रणजी ट्रॉफी आणि इतर स्पर्धांमध्ये त्याने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले. राजस्थानमधून तब्बल बारा वर्षांनंतर एखाद्या खेळाडूला कसोटी पदार्पणाची संधी मिळाल्याने राज्यातील क्रिकेटप्रेमींमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मानवची यशोगाथा संघर्षाने भरलेली आहे. क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी त्याला या क्षेत्रात फारसे भविष्य नसल्याचे सांगितले होते. मात्र त्याने हार न मानता मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. भारतीय संघात निवड झाल्याची माहिती त्याला सर्वप्रथम त्याच्या बहिणीकडून मिळाली होती. त्या क्षणाची आठवण सांगताना तो भावूकही झाला होता.
आज मानव सुथारचे नाव केवळ राजस्थानपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर संपूर्ण देश त्याच्याकडे भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील महत्त्वाच्या फिरकीपटू म्हणून पाहत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत केलेल्या दमदार सुरुवातीमुळे त्याने आपल्या उज्ज्वल भवितव्याची झलक दाखवून दिली आहे. भारतीय क्रिकेटला आगामी काळासाठी एक नवा आणि विश्वासार्ह फिरकीचा पर्याय मिळाल्याची भावना या पदार्पणानंतर अधिक दृढ झाली आहे.







