भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादव याची फलंदाजीतील घसरलेली कामगिरी आणि आगामी मोठ्या स्पर्धांचा विचार करता निवड समिती नव्या नेतृत्वाचा पर्याय शोधत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी निवडकर्ता देवांग गांधी यांनी एक मोठे विधान करत श्रेयस अय्यर यांना भारताच्या पुढील टी-२० कर्णधारपदासाठी सर्वात मजबूत दावेदार ठरवले आहे.
देवांग गांधी यांच्या मते, केवळ फलंदाज म्हणून नव्हे तर एक यशस्वी नेता म्हणूनही श्रेयस अय्यरने स्वतःला सिद्ध केले आहे. पंजाब किंग्सचे नेतृत्व करताना त्याने दाखवलेली परिपक्वता आणि यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल विजेतेपद मिळवून देण्याची कामगिरी त्याच्या नेतृत्वक्षमतेची साक्ष देते.
गांधी म्हणाले की, “आगामी ऑलिम्पिक स्पर्धेला अजून दोन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे निवडकर्ते कोणत्या खेळाडूंना दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहत आहेत, हा मोठा प्रश्न आहे. संघात स्पर्धा खूप तीव्र आहे. प्रत्येक खेळाडूला सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. श्रेयस अय्यर सातत्याने धावा करत आहे, तर रजत पाटीदारनेही नेतृत्व आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर प्रभाव टाकला आहे.”
मात्र सूर्यकुमार यादवबाबत बोलताना गांधी यांनी स्पष्ट शब्दांत चिंता व्यक्त केली. “सूर्यकुमारची फलंदाजीची फॉर्म चिंतेचा विषय ठरत आहे. माझ्या मते आता पुढच्या पर्यायांचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी सांगितले.
कर्णधारपदासाठी अनुभवाला सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगत गांधी म्हणाले, “संघाला असा कर्णधार हवा असतो ज्याच्याकडे आंतरराष्ट्रीय किंवा आयपीएलमधील नेतृत्वाचा भरपूर अनुभव असतो. श्रेयस अय्यरने पंजाब किंग्सचे नेतृत्व प्रभावीपणे केले आहे आणि यापूर्वी कोलकात्याला विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळे टी-२० कर्णधारपदाच्या शर्यतीत तो सध्या सर्वात पुढे असल्याचे मला वाटते. त्याला संधी मिळाली तर तो त्याचा पूर्णपणे हक्कदार आहे.”
इतकेच नव्हे तर गांधी यांनी भविष्यातील नेतृत्वगटाचाही आराखडा सुचवला. त्यांच्या मते, श्रेयस अय्यरला कर्णधारपद दिल्यास तिलक वर्मा किंवा ईशान किशन यांच्यापैकी एकाला उपकर्णधारपदाची जबाबदारी द्यावी. त्यातही ईशान किशन हा अधिक योग्य पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.
ईशान किशनने आयपीएल २०२६ च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व केले होते. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली झारखंड संघाने सैयद मुश्ताक अली स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये नव्या नेतृत्वाची पिढी तयार होत असल्याचे संकेत या चर्चांमधून मिळत आहेत.
आता निवड समिती नेमका कोणता निर्णय घेते, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे—टीम इंडियाच्या टी-२० कर्णधारपदाच्या शर्यतीत श्रेयस अय्यरचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.







