झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दोन जणांचे थोबाड काळे झाले आहे—एक राहुल गांधी आणि दुसरे अभिजीत दिपके. जंतर-मंतरवरील आंदोलन संपले, परंतु झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अजूनही संपलेले नाही. लाज वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना पत्र लिहिले आहे—’तुम्ही व्यक्तिशः जाऊन या विद्यार्थ्यांची भेट घ्या, त्यांच्याशी संवाद साधा.’ राहुल गांधी स्वतः तिथे का फिरकले नाहीत, याचे उत्तर मात्र ते देत नाहीत. सोरेन यांच्या डोक्यावर खापर फोडून स्वतः नामानिराळे राहण्याचा राहुल यांचा गेम फसलेला दिसतो; कारण आंदोलनकर्त्यांनी ‘झारखंड सरकारचा पाठिंबा काढून घ्या’ अशी मागणी करत राहुल गांधी यांनाच गोत्यात आणले आहे. दिल्लीवरून रांचीला जाणारी विमाने सुरू आहेत, परंतु राहुल गांधी यांना तिथे जाण्यासाठी मुहूर्त सापडत नाही किंवा विमानाचे तिकीट तरी मिळत नाही, सध्या तरी असे चित्र दिसत आहे. त्यामुळेच बहुधा त्यांनी हेमंत सोरेन यांना पत्र लिहिले आणि त्यांना आंदोलकांना भेटण्याचा, त्यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा सल्ला दिला. सोरेन यांची यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. राहुल गांधी देशातील एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला आदेश देत आहेत, तोही जाहीरपणे. राजकीय शिष्टाचार कशाला म्हणतात, हे आपल्याला कळत नसल्याचे राहुल गांधी यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. कंपनीचा एखादा वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्याला काय करावे आणि कसे करावे याच्या सूचना देतो, तसा काहीसा प्रकार राहुल गांधी यांनी सोरेन यांच्याबाबत केलेला आहे. आपण कोणीतरी विशेष आहोत, जगावेगळे आहोत आणि बाकीचे लोक सटरफटर आहेत, हा राहुल गांधी यांचा गैरसमज या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला आहे.



