कोकण आणि गणपती… हे समीकरण कधीच बदलत नाही. कोकणातला गणराय म्हणजे प्रत्येक चाकरमान्याच्या आयुष्याचा जिव्हाळ्याचा सोहळा. मुंबईत कितीही मोठी नोकरी असो, कितीही कामाचा व्याप असो. पण गणपतीला गावाकडे जायचंच! हा कोकणवासीयांचा शब्द असतो. घरातल्या बाप्पाची प्रतिष्ठापना, आईच्या हातचा प्रसाद, गावची आरती आणि आपल्या मातीतला उत्सव अनुभवण्यासाठी लाखो चाकरमानी वर्षभर वाट पाहत असतात.
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण सुरू होताच अवघ्या दोन ते तीन मिनिटांत कोकणकन्या, नेत्रावती, तुतारी, मत्स्यगंधा, जनशताब्दी, तेजस, मांडवी आणि दिवा–सावंतवाडी एक्स्प्रेससह बहुतांश लोकप्रिय गाड्यांमधील सर्व जागा संपल्या. नियमित आरक्षण तर दूरच, प्रतीक्षा यादीची मर्यादाही पूर्ण झाली. परिणामी हजारो चाकरमान्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एकच शब्द झळकला. REGRET.
यंदा १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून त्याआधी शनिवार-रविवारची जोड मिळाल्याने मोठ्या संख्येने चाकरमान्यांनी १२ आणि १३ सप्टेंबरलाच गावी पोहोचण्याचे नियोजन केले. त्यामुळे आरक्षण सुरू होताच तिकीटांसाठी अक्षरशः डिजिटल झुंबड उडाली.
तीन मिनिटांत तिकीट संपलं…
सकाळी आठ वाजता आरक्षण सुरू झाले आणि आठ वाजून तीन मिनिटे होत नाहीत तोच सर्व गाड्या फुल्ल झाल्या. अनेकांना आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच रिग्रेटचा संदेश दिसला. समाजमाध्यमांवरही चाकरमान्यांनी संताप व्यक्त करत, गणपतीचं तिकीट मिळणं आता नियोजनावर नाही, तर नशिबावर अवलंबून झालं आहे, अशी भावना मांडली.
दरवर्षी तीच कथा… बदल मात्र शून्य
गणेशोत्सव जवळ आला की कोकण रेल्वेवर ताण वाढतो, लाखो प्रवासी तिकीटासाठी धडपड करतात आणि काही मिनिटांत सर्व आरक्षण संपते. ही परिस्थिती नवी नाही. तरीही कायमस्वरूपी क्षमतावाढ, नवीन गाड्या किंवा अतिरिक्त डबे याबाबत ठोस निर्णय होत नसल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
कोकण रेल्वेचे अभ्यासक अक्षय महापदी म्हणाले, गणेशोत्सवापूर्वी कोकणकन्या रिग्रेट महोत्सव सुरू होणे हे आता जणू परंपराच बनली आहे. मागणी प्रचंड आहे; पण त्यानुसार रेल्वेची क्षमता वाढत नाही. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा विशेष गाड्यांच्या घोषणेकडे आहेत.
दलालांवर कारवाई, विशेष गाड्यांची प्रतीक्षा
आरक्षण सुरू होताच तिकीट संपण्यामागे अनधिकृत दलालांचाही हात असल्याची शंका अनेक प्रवाशांनी व्यक्त केली आहे. याआधी रेल्वेने अनेक IRCTC आयडींवर कारवाई केली होती. यंदाही अशाच धडक मोहिमा राबवून सामान्य चाकरमान्यांना दिलासा द्यावा, तसेच गणपती स्पेशल रेल्वेगाड्या तातडीने जाहीर कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कारण कोकणातल्या चाकरमान्यासाठी गणपती हा फक्त सण नसतो… तो घराशी, मातीशी आणि आठवणींशी जोडणारा भावनिक धागा असतो. आणि त्या धाग्यापर्यंत पोहोचण्याचा पहिला टप्पाच यंदा ‘रिग्रेट’मध्ये अडकला आहे.