मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) नागरिकांना लेप्टोस्पायरोसिस या आजारापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. शरीरावर जखम, खरचटलेली जागा किंवा कापलेली त्वचा असताना पावसाचे साचलेले पाणी किंवा चिखलातून चालल्यास संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, असा इशारा महानगरपालिकेने दिला आहे.
महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या ऍडव्हायझरीनुसार, ज्या नागरिकांचा साचलेल्या पावसाच्या पाण्याशी किंवा चिखलाशी संपर्क आला असेल, त्यांनी २४ ते ७२ तासांच्या आत डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करून घ्यावेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत साचलेल्या किंवा हळूहळू वाहणाऱ्या पाण्यातून चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः शरीरावर जखम किंवा अगदी किरकोळ खरचटलेली जागा असलेल्या व्यक्तींना, लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याचे बीएमसीने स्पष्ट केले आहे. महापालिकेने सांगितले की, लेप्टोस्पायरोसिस हा गंभीर आजार असून, वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास तो जीवघेणाही ठरू शकतो.
संसर्ग कसा होतो?
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, दूषित चिखल आणि पावसाच्या पाण्यात लेप्टोस्पायरा (Leptospira) हे जीवाणू असू शकतात. हे जीवाणू त्वचेवरील लहान जखम, खरचटलेली जागा किंवा कापलेल्या भागातून शरीरात प्रवेश करून संसर्ग करतात. त्यामुळे पावसाचे पाणी किंवा चिखलाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि २४ ते ७२ तासांच्या आत प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत.
मोफत तपासणी आणि औषधांची सुविधा
मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, महानगरपालिकेचे दवाखाने, आरोग्य केंद्रे आणि पालिका रुग्णालयांमध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला, आरोग्य तपासणी, मार्गदर्शन आणि प्रतिबंधात्मक औषधे मोफत उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. तसेच या आजाराबाबत कुटुंबीय, मित्र आणि शेजाऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहनही महापालिकेने केले आहे.
तापाकडे दुर्लक्ष करू नका
पावसाळ्यात येणाऱ्या तापाकडे दुर्लक्ष करू नये, कारण तो लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू किंवा मलेरिया यांसारख्या आजारांचे सुरुवातीचे लक्षण असू शकते, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. ताप किंवा इतर संबंधित लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधे न घेता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या महत्त्वाच्या सूचना
- पायाला जखम किंवा खरचटलेली जागा असल्यास साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे.
- पाण्यातून जाणे अपरिहार्य असल्यास रबरी बूट किंवा संरक्षणात्मक पादत्राणे वापरावीत.
- पावसाच्या पाण्याच्या संपर्कानंतर पाय साबण आणि स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून कोरडे करावेत, जेणेकरून संसर्गाचा धोका कमी होईल.
