मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करणारा बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही कायम असून तो लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरही कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून केवळ तोंडी आश्वासन नको, तर मागण्यांबाबत स्पष्ट आणि लेखी हमी मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे नेते उदय आंबोणकर यांनी सांगितले की, जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांसोबत थेट बैठक होत नाही आणि मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप मागे घेण्याचा किंवा कोणतीही तडजोड करण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे सरकार आणि कर्मचाऱ्यांमधील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे ही वाचा:
गणपतीपुळ्यात समुद्राचा घाला; संभाजीनगरच्या पाच तरुणांचा मृत्यू
परभणीत सभामंडप कोसळला! ७ भाविकांचा दुर्दैवी अंत
पश्चिम आशियातील शांततेचे संकेत
भाचीची छेड काढली म्हणून जाब विचारणाऱ्या आनंदकुमारचा नासिरने चिरला गळा
संपामुळे मुंबईतील बससेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे, रिक्षा, टॅक्सी किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी वाढली असून प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत.
दरम्यान, संप रविवारीही कायम राहण्याची शक्यता असल्याने विविध स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि भरती प्रक्रियेच्या परीक्षांना जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. बेस्ट बससेवा बंद असल्याने परीक्षा केंद्रांपर्यंत वेळेत पोहोचणे विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. अनेक परीक्षा केंद्रे उपनगरांमध्ये आणि शहराच्या विविध भागांत असल्याने विद्यार्थी आणि पालकांना पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे परीक्षार्थींसह त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शुक्रवारी झालेल्या चर्चेतून कोणताही मार्ग न निघाल्याने मुंबईकरांची गैरसोय आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतरच या संपावर तोडगा निघण्याची आशा व्यक्त केली जात असून, तोपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संघर्ष आणि मुंबईकरांची कसरत कायम राहणार आहे.







