गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या पावसाचा सकारात्मक परिणाम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांवर दिसून येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) जल अभियांत्रिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर (ML) इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या जवळपास ७.९४ टक्के इतका आहे.
मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या भातसा, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, विहार आणि तुळशी या सात तलावांच्या पाणीसाठ्यात मागील २४ तासांत लक्षणीय वाढ झाली आहे. पावसामुळे विशेषतः विहार तलावात ०.२७ मीटर, मध्य वैतरणा तलावात ०.२८ मीटर, तर तुळशी तलावात ०.०५ मीटर पाणीपातळी वाढल्याची नोंद करण्यात आली आहे.
सध्या सातही तलावांमधील एकत्रित उपयुक्त पाणीसाठा १,१४,८६३ दशलक्ष लिटर इतका असून गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ४,७६,०९८ दशलक्ष लिटर होता. त्यामुळे यंदा पाणीसाठा अद्याप तुलनेने कमी असला तरी गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे परिस्थितीत सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. तलावनिहाय आकडेवारीनुसार, भातसा तलावात ५०,२७७ दशलक्ष लिटर, विहार तलावात १२,४९९ दशलक्ष लिटर, तुळशी तलावात १,७७२ दशलक्ष लिटर, मध्य वैतरणा तलावात २१,२५७ दशलक्ष लिटर, मोडक सागरमध्ये २६,३७५ दशलक्ष लिटर, तर तानसा तलावात २,६८४ दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. अप्पर वैतरणा तलावाची पाणीपातळी अद्याप किमान मर्यादेपेक्षा खाली असल्याने त्यातील उपयुक्त साठा शून्य मानण्यात आला आहे.
हे ही वाचा:
मान्सूनची दमदार हजेरी; मुंबईत २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद
आरोग्य खर्च वाटपाचा ३०-३०-३०-१० फॉर्म्युला; परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी प्रस्ताव
एआयमुळे ओरॅकलने काढले वर्षभरात २१ हजार कर्मचारी
दरम्यान, भांडुप संकुल परिसरात मागील २४ तासांत १८२ मिमी पावसाची नोंद झाली असून हंगामातील एकूण पर्जन्यमान १८९ मिमी झाले आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने तलावांतील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी जून महिन्याच्या अखेरीस तलावांतील पाणीसाठ्याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून असते. यंदा मान्सूनच्या उशिरा झालेल्या दमदार आगमनानंतर तलाव क्षेत्रात चांगला पाऊस सुरू झाल्याने पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात कमी झाली असून आगामी आठवड्यात जलसाठ्याची स्थिती अधिक समाधानकारक होण्याची अपेक्षा आहे.







