नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (एनएमआयए) अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय विमानसेवेला सुरुवात झाली असून, एअर इंडिया एक्सप्रेसचे पहिले नियोजित उड्डाण अबूधाबीसाठी रवाना झाले. या सेवेमुळे मुंबई महानगर प्रदेशाची आंतरराष्ट्रीय संपर्कक्षमता वाढणार असून विमानतळाला जागतिक प्रवेशद्वाराचे स्वरूप मिळणार आहे.
पहिले उड्डाण
सुमारे १०० प्रवाशांना घेऊन एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान पहाटे २.५५ वाजता (भारतीय वेळेनुसार) नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण केले. हे विमान सुमारे अडीच तासांच्या प्रवासानंतर संयुक्त अरब अमिरातीतील अबूधाबी विमानतळावर पोहोचले. नवी मुंबई–अबूधाबी ही सेवा आठवड्यातून तीन दिवस चालविण्यात येणार असून, मुंबई महानगर प्रदेश आणि यूएई दरम्यान थेट हवाई संपर्क उपलब्ध होणार आहे.
बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानाद्वारे संचालित या ऐतिहासिक उड्डाणापूर्वी वैमानिकाने प्रवाशांना संबोधित करताना, “हे उड्डाण ऐतिहासिक असून विमानतळाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे,” असे सांगितले.
हे ही वाचा:
होर्मुझमधील हल्ल्यापूर्वी पुण्याच्या हेरंब करमरकर यांनी पाठवला होता शेवटचा संदेश
ममतांची साथ सोडत तृणमूलचे मदन मित्रा बंडखोर गटात
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निष्क्रियतेमुळे यूएनवरील विश्वास ढासळतोय
भारत ठेवणार प्रत्येक भारतीय खलाशावर लक्ष
पहिल्या उड्डाणातील प्रवासी शाकीर आबिद यांनी पत्नी आणि मुलीसह या प्रवासात सहभाग घेतला. त्यांनी सांगितले की, हा प्रवास त्यांच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय आठवणी निर्माण करणारा आहे. अबूधाबीहून ते पुढे मस्कतला जाणार असून तेथे त्यांच्या मुलगी सफाचा तिसरा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.
मालवाहतुकीलाही चालना
या आंतरराष्ट्रीय उड्डाणासह नवी मुंबई विमानतळावरून पहिली नाशवंत वस्तूंची आंतरराष्ट्रीय निर्यातही करण्यात आली. त्यामुळे विमानतळाच्या कार्गो क्षमतेलाही मोठी चालना मिळाली आहे. डिसेंबरमध्ये देशांतर्गत व्यावसायिक सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा-सात महिन्यांत विमानतळाने वेगाने विस्तार साधला आहे.
सात महिन्यांत मोठी प्रगती
सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ४६ देशांतर्गत शहरांशी हवाई संपर्क प्रस्थापित झाला आहे. आतापर्यंत २३ लाखांहून अधिक प्रवाशांनी या विमानतळाचा वापर केला असून दररोज सुमारे १५० विमान हालचाली (एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स) होत आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अदानी समूह आणि महाराष्ट्र शासनाच्या सिडको यांचा संयुक्त प्रकल्प आहे. पुढील टप्प्यात आणखी आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू करण्याची योजना आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचे अध्यक्ष निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, नवी मुंबई विमानतळ हा कंपनीच्या दुहेरी विमानतळ धोरणाचा महत्त्वाचा भाग असून, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नेटवर्कला तो पूरक ठरणार आहे.
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल म्हणाले, “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिले नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाण हा विमानतळाच्या विकासातील नव्या पर्वाचा प्रारंभ आहे.”
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एनएमआयएएल) या विशेष उद्देश संस्थेमार्फत टप्प्याटप्प्याने केला जात असून, त्यातील ७४ टक्के हिस्सा अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जकडे तर उर्वरित २६ टक्के हिस्सा सिडकोकडे आहे.







