संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आपण सर्वांनी पाहिले आहे की आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, ब्रह्मोस, आकाश तीर एअर डिफेन्स कंट्रोल सिस्टम आणि इतर अनेक स्वदेशी प्लॅटफॉर्मनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपल्या सामर्थ्याचा अद्भुत परिचय दिला. या स्वदेशी प्लॅटफॉर्मच्या यशामुळे केवळ प्रादेशिकच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. ते म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरचे यश आमच्या शूर सैनिकांसोबतच त्या सर्वांना देखील जाते, जे मागील पंक्तीत राहून या मोहिमेच्या यशासाठी अखंड प्रयत्नशील होते.” संरक्षणमंत्री सोमवारी सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (SIDM) या संस्थेला संबोधित करत होते.
राजनाथ सिंह म्हणाले, “तुमच्यासारखे इंडस्ट्री वॉरियर्स, ज्यांनी नावीन्य, डिझाईन आणि उत्पादनाच्या क्षेत्रात झटून काम केले, ते या विजयाचे समान हक्कदार आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, “अलीकडील पहलगाम हल्ल्यानंतर ज्या प्रकारे आपण ऑपरेशन सिंदूर राबवले, त्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली होती की जणू युद्ध आपल्या दाराशीच येऊन ठेपले होते. मात्र आपल्या सैन्यदलांची तयारी अशी आहे की कोणत्याही परिस्थितीत ते सीमांचे रक्षण करण्यास सज्ज आहेत. पण मी एवढेच सांगू इच्छितो की जगात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था यांमध्ये अनिश्चितता वाढली आहे.”
हेही वाचा..
इन्फंट्री डे : भारतीय लष्करी इतिहासातील सुवर्ण अध्याय
दक्षिण कोरियात पाकिस्तानी लष्कराविरुद्ध संताप
अंतर्गत रक्तस्त्रावामुळे श्रेयस अय्यर आयसीयुत दाखल, बीसीसीआयने काय म्हटले?
दात काढलेला नाग घेऊन भिक्षा मागणाऱ्यांना पकडले
त्यांनी अधोरेखित केले की, “या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आपल्याला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल. संरक्षणक्षेत्र आणि युद्धाच्या तंत्रज्ञानात जे बदल होत आहेत, त्यांचा सामना केवळ स्वदेशीकरणाच्या माध्यमातूनच करता येईल. आपल्यासाठी संरक्षणक्षेत्र हे फक्त आर्थिक वृद्धीचे साधन नाही, तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा मूलाधार आहे. आणि जेव्हा सार्वभौमत्वाची गोष्ट येते, तेव्हा ती केवळ सरकारची नव्हे, तर प्रत्येक नागरिक, प्रत्येक संस्था आणि प्रत्येक उद्योगाची सामूहिक जबाबदारी ठरते. ऑपरेशन सिंदूरनंतर ही गोष्ट अधिक महत्त्वाची ठरली आहे.”
संरक्षणमंत्री म्हणाले, “एसआयडीएमला स्थापन होऊन आता ९ वर्षे झाली आहेत. या अल्प काळात संस्थेने इतके उत्कृष्ट काम केले आहे की देशाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आपण ज्या प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले आहे, त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. जर आपली आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या आपल्या सुरक्षेच्या तीन भक्कम आधारस्तंभ आहेत, तर आपण म्हणजे उद्योगक्षेत्र, हे चौथे मजबूत स्तंभ आहात.” ते पुढे म्हणाले, “आत्मनिर्भरता हा आमच्यासाठी केवळ नारा नाही, तर भारताच्या प्राचीन परंपरेचा आधुनिक अविष्कार आहे. एक काळ होता जेव्हा आपल्या प्रत्येक गावात एखादी ना एखादी उद्योगशाखा होती. भारताला ‘सोन्याची चिमणी’ म्हणून ओळखले जात होते कारण आपण आपल्या गरजांसाठी बाहेर पाहत नव्हतो — सर्व काही आपल्या भूमीवरच निर्माण करत होतो. आज निर्माण आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात स्वदेशीकरणाला प्राधान्य देऊन आपण त्या परंपरेला आधुनिक रूप दिले आहे.”
राजनाथ सिंह म्हणाले, “सरकारने खाजगी क्षेत्रावर विश्वास दाखवला आणि त्याचाच परिणाम आहे की आज आपण सेमिकंडक्टर फॅब्रिकेशनसारख्या अत्यावश्यक क्षेत्रातही वेगाने प्रगती करत आहोत. देशभरात सुमारे १० फॅब्रिकेशन प्लांट उभारले जात आहेत.” संरक्षणमंत्री म्हणाले, “कोणत्याही युद्धासारख्या परिस्थितीसाठी आपल्याला केवळ तयार राहायचे नाही, तर आपली तयारी स्वतःच्या बळावर असली पाहिजे. आज मला आनंद आहे की आपले संरक्षण उद्योग या दिशेने सक्षमपणे पुढे सरकत आहेत.”
ते पुढे म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत आपण जी मेहनत घेतली, त्याचे फळ म्हणजे आपले देशांतर्गत संरक्षण उत्पादन, जे २०१४ मध्ये केवळ ४६,४२५ कोटी रुपये होते, ते आज वाढून विक्रमी १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. त्यातील ३३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक योगदान हे खाजगी क्षेत्रातून आले आहे — हे आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या यशाचे द्योतक आहे.” राजनाथ सिंह यांच्या मते, “खाजगी क्षेत्रातील वाढत्या सहभागाचाच परिणाम आहे की भारताचा संरक्षण निर्यात महसूल, जो १० वर्षांपूर्वी १,००० कोटी रुपयांपेक्षा कमी होता, तो आज वाढून विक्रमी २३,५०० कोटी रुपये झाला आहे. सरकारही आपल्या पातळीवरून देशी विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.”







