ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशात पूरस्थिती गंभीर बनली असून, आतापर्यंत २२ हजारांहून अधिक नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली असून रस्ते, पूल आणि रेल्वे मार्गांचे मोठे नुकसान झाले आहे. आसाममधील धेमाजी जिल्ह्यात सिमेन नदीवरील रेल्वे पुलाचा एक भाग कोसळल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. प्रशासनाने बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अरुणाचल प्रदेशातील नद्यांना पूर आला असून त्याचा परिणाम खालच्या भागातील आसाममध्येही दिसून येत आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सहा जिल्ह्यांतील ९६ हून अधिक गावे पाण्याखाली गेली असून २२ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
धेमाजी जिल्ह्यातील सिमेन नदीवरील रेल्वे पुलाचा काही भाग नदीकाठची धूप झाल्याने कोसळला. दुर्घटनेनंतर त्या मार्गावरील सर्व रेल्वे सेवा तातडीने स्थगित करण्यात आल्या. या घटनेमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून रेल्वे प्रशासनाकडून पुलाची तपासणी आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
अरुणाचल प्रदेशातही परिस्थिती चिंताजनक असून मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात आतापर्यंत किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने रस्ते बंद झाले असून काही नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव मोहिमेसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक प्रशासन आणि इतर यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.
हवामान विभागाने पुढील २४ तासांत अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या आणि भूस्खलनप्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा:
जर्मनीत ग्रुमिंग टोळीचे काळे कारनामे; सीरियन पुरुषांसह दोन पाकिस्तानी तरुणांना अटक
नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेला फाशी!
सोन्याची चमक फिकी; चांदीतही घसरण
जागतिक बाजारात भारताची दमदार एन्ट्री; पाचवा सर्वात मोठा शेअर बाजार
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवले असून बाधित नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. विविध ठिकाणी मदत शिबिरे सुरू करण्यात आली असून अन्न, पिण्याचे पाणी आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
