भारत ठेवणार प्रत्येक भारतीय खलाशावर लक्ष

होर्मुझ हल्ल्यानंतर सतर्कता

भारत ठेवणार प्रत्येक भारतीय खलाशावर लक्ष

हॉर्मुझ सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर आणि एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सागरी सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पर्शियन आखात, हॉर्मुझ सामुद्रधुनी आणि ओमानच्या आखातातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक भारतीय खलाशावर रिअल-टाइम नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा उभारली जाणार आहे.

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आंतरमंत्रालयीन बैठक झाली. या बैठकीत महासंचालक (शिपिंग) कार्यालयाला (Directorate General of Shipping) भारतीय खलाशी असलेल्या सर्व जहाजांवर सतत देखरेख ठेवण्यासाठी लाइव्ह ऑपरेशनल डॅशबोर्ड विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रणालीद्वारे जहाजांचे स्थान, क्रू सदस्यांची माहिती, माल, प्रवासाचा मार्ग आणि संभाव्य सुरक्षा धोके यांचा रिअल-टाइम आढावा घेतला जाणार आहे.

सरकारने प्रभावित भारतीय खलाशांसाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचाही निर्णय घेतला आहे. हे अधिकारी जखमी किंवा प्रभावित खलाशांच्या कुटुंबीयांशी सतत संपर्कात राहतील. वैद्यकीय उपचार, मायदेशी परत आणण्याची प्रक्रिया, नुकसानभरपाई आणि इतर कल्याणकारी मदतीचे समन्वयन त्यांच्यामार्फत केले जाईल. तसेच भारतीय खलाशी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी २४x७ हेल्पलाइन व तक्रार निवारण व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

या बैठकीत परराष्ट्र मंत्रालय, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, रसायन व खत मंत्रालय, भारतीय नौदल तसेच इराण, ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय दूतावासांमध्ये अधिक समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पश्चिम आशियातील बदलत्या सुरक्षा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून गरज पडल्यास तातडीची मदत पुरविण्यावर भर देण्यात आला आहे.

ही पावले हॉर्मुझ सामुद्रधुनीत MT Al Bahiyah आणि MT Mombasa या संयुक्त अरब अमिरातीच्या तेलवाहू जहाजांवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर उचलण्यात आली आहेत. या दोन्ही जहाजांवर एकूण ३० भारतीय खलाशी कार्यरत होते. हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर भारताने इराणच्या दूतावासातील उपप्रमुखांना पाचारण करून तीव्र निषेध नोंदवला आणि व्यापारी जहाजांवरील हल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा:

मुंबईतील शालीमार, नूर मोहम्मदीसह तीन रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

E20 धोरणावर दिशाभूल करणारे व्हिडिओ; मनीष कश्यपसह चार इन्फ्लुएन्सर्सविरुद्ध गुन्हा

भारत-चीनला अमेरिकेकडून मिळणार दिलासा? ५००% ऐवजी १००% शुल्काचा प्रस्ताव

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क, पुण्यातल्या ६६ जणांची चौकशी

माहितीनुसार, पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत १३ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यातील बहुतांश जण व्यापारी जहाजांवर काम करणारे खलाशी किंवा संबंधित कर्मचारी होते. त्यामुळे भारतीय खलाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Exit mobile version