महाराष्ट्रातील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या लाखो उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. रविवारी, २८ जून रोजी होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीच्या संशयामुळे ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी पुढे ढकलण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात टीईटीची प्रश्नपत्रिका असल्याचा संशय असलेले साहित्य जप्त करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (एमएससीई) ही परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर भिवंडी परिसरात कारवाई करण्यात आली. छाप्यात जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि मूळ टीईटी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न जुळत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यानंतर परीक्षेची गोपनीयता आणि पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असून पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी पोलीस चौकशी करत आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे संचालक नंदकुमार बेडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी पहाटे पोलिसांना अशी गोपनीय माहिती मिळाली की, भिवंडीतील काही लोकांकडे टीईटी (TET) प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे. या माहितीच्या आधारे, भिवंडी पोलिसांनी छापा टाकला आणि घटनास्थळावरून जप्त केलेल्या साहित्याची पडताळणी करण्यासाठी परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावले. पडताळणी प्रक्रियेदरम्यान, अधिकाऱ्यांना असे आढळून आले की जप्त केलेल्या कागदपत्रांमधील काही प्रश्न प्रत्यक्ष TET २०२६ च्या प्रश्नपत्रिकेशी जुळत आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
ही परीक्षा राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर होणार होती. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून पात्रता मिळवण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. परीक्षा स्थगित झाल्यामुळे राज्यभरातील हजारो उमेदवारांचा प्रवास, निवास आणि इतर तयारीवर परिणाम झाला आहे.
हे ही वाचा:
“पत्रकारितेचे स्वातंत्र्य म्हणजे नागरिकांना छळण्याचा परवाना नाही”
घुसखोरीच्या प्रयत्नात असलेला पाकव्याप्त काश्मीरातील २६ वर्षीय तरुण ताब्यात
पुढील वर्षाच्या प्रारंभी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार?
आता लोकल रेल्वेच्या डब्यातून धर्मांतरणांचे रॅकेट
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून नवीन परीक्षा तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. नव्या तारखेनंतर उमेदवारांना नवीन प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) डाउनलोड करावे लागेल. परीक्षेचे स्वरूप किंवा अभ्यासक्रमात कोणताही बदल होणार नसल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील स्पर्धा आणि पात्रता परीक्षांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभारण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी उमेदवारांकडून तसेच विविध संघटनांकडून होत आहे.







