मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान चेंबूर परिसरात मंगळवारी (३० जून) दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर अचानक मोठे झाड कोसळल्याने बसचे मोठे नुकसान झाले. या अपघातात १० विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी काहींना किरकोळ तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे. सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
चेंबूर येथील ११ नंबर रोडवर ही घटना एका रस्त्यावर दुपारच्या सुमारास घडली. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड अचानक उन्मळून थेट शाळेच्या बसवर कोसळले. झाडाचा मोठा भाग बसच्या छतावर पडल्याने बसचे छप्पर आणि काचा फुटल्या. ही बस टिळकनगरमधील युनिव्हर्सल शाळेची असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर झाड हटवण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकांमधून तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. बहुतांश विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात असले, तरी काही विद्यार्थ्यांना अधिक निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. ११ वर्षीय विहान श्रीवास्तव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली आणि अपघाताची माहिती घेतली. हा अपघात दुर्दैवी असल्याचे मत रितू तावडे यांनी व्यक्त केले. तसेच या भागातील झाडांची पावसाळापूर्वीची छाटणी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे रितू तावडे म्हणाल्या. स्थानिकांनी या झाडाविषयी तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले आणि या तक्रारीकडे दुर्लक्ष केले असल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचा इशारा रितू तावडे यांनी दिला.
हे ही वाचा:
मुंबईच्या घरबाजाराचा ‘सुपरहिट’ जून! १२,७६६ प्रॉपर्टी व्यवहारांची नोंद
“आमचे राजकारण तोडण्यासाठी नव्हे, तर जोडण्यासाठी”
‘ऑपरेशन टायगर’; सचिन अहिर पण आले शिवसेनेत
प्रचंड लाटा, जोरदार वाऱ्यांच्या तडाख्यात अडकली बोट, ६ मच्छिमार वाचले
या घटनेमुळे मुंबईतील जुन्या आणि धोकादायक झाडांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रत्येक पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे धोकादायक झाडांची वेळेत छाटणी आणि तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे. प्रशासनानेही या घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.







