29.8 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरविशेषइजिप्तमध्ये नेताजींना नेमका कोणता साक्षात्कार झाला?

इजिप्तमध्ये नेताजींना नेमका कोणता साक्षात्कार झाला?

औटघटकेच्या इजिप्त भेटीत नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी हिंदू संस्कृती आणि इजिप्शियन संस्कृती यांचे तुलनात्मक विश्लेषण केले. नेत्यजींच्या या इजिप्त भेटी विषयी अभ्यासक प्रियदर्शी दत्ता यांचा लेख. 

Google News Follow

Related

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने एक राष्ट्रभक्त, संघटक, योद्धा आणि राष्ट्र निर्माते म्हणून त्यांचे स्मरण सगळेच करतील. आझाद हिंद सेनेचे प्रमुख म्हणून असलेली त्यांची प्रतिमा त्यांच्यातील विचारवंत, तत्वज्ञ, आणि अध्यात्मिक पैलूंना झाकोळते. २ नोव्हेंबर १९४१ रोजी बर्लिनमधल्या ‘फ्री इंडिया सेंटर’ च्या सभासदांकडून ‘नेताजी’ ही उपाधी मिळण्यापूर्वी काँग्रेसमधील दोन दशकांच्या कार्यकाळात ते सुभाष चंद्र बोस म्हणूनच ओळखले जायचे. त्यांच्या व्यस्त राजकीय आयुष्यात त्यांनी त्यांच्यातील अध्यात्मिक आणि तात्त्विक पैलूंचे जतन केले. त्यांच्या तुरुंगवासाच्या ११ शिक्षांनी त्यांच्यात ही क्षमता विकसित  झाली असावी.

काँग्रेसमधील त्यांच्या कार्यकाळातही त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला परदेशी समर्थन मिळवण्याचा नेहमीच प्रयत्न केला.  आपली प्रकृती सुधारण्यासाठी १९३३ ते १९३६ या काळात ते युरोपातील व्हिएन्ना येथील आरोग्य आश्रमात गेले होते. इथेही त्यांनी एडवर्ड बेनेस, एमोन दी वॅलेरा आणि बेनिटो मुसोलिनी यांसारख्या बड्या नेत्यांना भेटून भारताच्या स्वातंत्र्याच्या उद्दिष्टासाठी समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या असे लक्षात आले की फॅसिझम, नाझीवाद, आणि साम्यवाद यांच्यात कितीही वैचारिक संघर्ष असला तरीही बरेच साम्य आहे. त्यांचा असा दृढ विश्वास होता की वाद आणि प्रतिवाद यांच्या संघर्षातून संवाद निर्माण होईल. त्यांना खात्री पटली होती की २० व्या शतकात भारत आपले राजकीय विचार जगाला देईल.

या विचारांबाबत त्यांचे मत काय होते हे जाणून घेणे महत्वाचे आहे. इजिप्तच्या अल्पशा प्रवासाच्या निमित्ताने त्यांनी भारत आणि इजिप्शिअन संस्कृतीचा तुलनात्मक विचार केला होता.  १९३४ साली बोस यांचे वडील जानकी नाथ बोस यांचा मृत्यु झाला. त्यांना भारतात परतावे लागले. वडिलांच्या अंत्यविधीनंतर ते जानेवारी १९३५ मध्ये युरोपात परतले. भारत-युरोप जलमार्गावरील प्रवाशांना कैरोमध्ये २४ तासांचा वेळ मिळत असे. हे २४ तास नेताजी इजिप्तमध्ये फिरले. हा वेळ सत्कारणी लावत मुस्तफा एल नहास पाशा या वफ्द पक्षाच्या राष्ट्रवादी नेत्याची भेट घेतली. या भेटीत पाशा यांचे दोन सहकारी एम.एफ.नोक्राशी आणि मक्रम एबीद हे सुद्धा उपस्थित होते. इजिप्त हा देश संविधानिक राजेशाही असला तरीही ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. हिंदू-मुस्लिम प्रश्नावर नहास पाशा याने भारतीय राष्ट्र्वादासाठी आग्रही असलेल्या मुस्लिम कट्टरवाद्यांचा निषेध केला होता. याचे समर्थन करताना त्याने इजिप्शियन राष्ट्रवादासाठी एकत्रपणे काम करणाऱ्या मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे उदाहरण दिले.

या इजिप्त दौऱ्यात नेताजींनी कैरो बाहेर असलेल्या गिझा कॉम्प्लेक्सला भेट दिली जिथे त्यांनी पायरॅमिड्स, स्फिन्क्स आणि वस्तुसंग्रहालयाला भेट दिली. तिथे त्यांच्या लक्षात आले “इजिप्तच्या तुलनेत भारताने आपली प्राचीन संस्कृती आणि परंपरा जपली याचा आपण अभिमान बाळगू शकतो, पण कलेचे जतन करण्याबाबत मात्र आपण इजिप्शियन्सच्या तुलनेत अगदीच अकार्यक्षम ठरलो.” सुभाषबाबू म्हणतात, “मला वाटते इजिप्शियन लोकांनी कला विषयात जेवढी भौतिक प्रगती केली तेवढी आपण करू शकलो नाही. आपला भर कायमच संस्कृतिक वारशापेक्षा बौद्धिक आणि अध्यात्मिक वारशावर राहिला आहे. त्याचे आपल्याला फायदे आणि तोटे दोन्ही झाले. आपल्या उच्च वैचारीक बांधिलकीमुळे आपण परकीय आक्रमणांविरोधात तग धरून उभे राहिलो, काही वेळा आपला पराभव झाला, परंतु कालांतराने आपण परकीयांना समाजात रिचवले. पण इजिप्शियन लोकांना हे जमले नाही. त्यांनी अरब आक्रमकांसमोर गुढगे टेकले.”

भारत आणि इजिप्त दोन्ही प्राचीन राष्ट्र्र आहेत. तरीही दोघांमध्ये मुलभूत फरक आहे. इजिप्त हे दगडी मौल्यवान वस्तूंच्या एका खुल्या वस्तू संग्रहालयासारखे भासत असले तरीही तेथील प्राचीन भाषा, साहित्य आणि परंपरा यांचा वारसा लुप्त झाला आहे. सगळे इजिप्शियन नागरिक मातृभाषा म्हणून अरबी बोलतात, जी भाषा अरब आक्रमकांसोब इ.स. ६४० साली इजिप्तमध्ये आली. इजिप्त मध्ये आता ८० टक्के मुस्लिम नागरिक असून १५ टक्के ख्रिश्चन आहेत. इजिप्त हे अरब विश्वाचे केंद्र आहे, जिथे अरब लिगचे मुख्यालय आहे. दुसरीकडे भारतात पिरॅमिड्स आणि स्फिन्क्स यांच्यासारखा पुरातत्व वारसा कमी असला तरीही आपण हिंदू धर्म, संस्कृत साहित्य, ज्ञान परंपरा इत्यादी गोष्टी जतन केल्या आहेत.

एक डोळा भारतीय स्वातंत्र्यावर ठेवत भारताच्या तग धरण्याच्या क्षमतेचे कौतुक करताना सुभाष चंद्र बोस यांनी एकत्रित होणाऱ्या भारताच्या भौतिक आणि सांस्कृतिक विकासाचीही पाठराखण केली आहे. “शरीर आणि आत्मा यांच्यातील परस्पर संबंध लक्षात घेता, शरीराकडे होणारे दुर्लक्ष राष्ट्राला फक्त भौतिकदृष्ट्या नाही तर अध्यात्मिकदृष्ट्याही दुबळे बनवते. जर आपल्याला आपले गतवैभव परत मिळवायचे असेल तर आपल्याला दोन्ही पातळीवर एकत्रित पुढे जावे लागेल.”

पुढे सुभाष चंद्र बोस यांच्या कार्यातून हे सिद्ध झाले की त्यांचे विचार किती प्रामाणिक होते. 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा