भारतात खेळण्याची हिंमत न दाखवता बांगलादेशने टी20 वर्ल्ड कप 2026 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेचे कारण पुढे करत बांगलादेशने भारतात सामने खेळण्यास ठाम नकार दिला असून, यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
बांगलादेश सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भारतामध्ये खेळण्याची आमची कोणतीही तयारी नाही. आयसीसीने आमच्या मागणीला न्याय दिलेला नाही.” बांगलादेशने भारताऐवजी श्रीलंकेत सामने खेळवण्याची मागणी केली होती, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ही मागणी फेटाळून लावली.
खेळाडू आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना आसिफ नजरुल म्हणाले, “आमच्या निर्णयात बदल होण्याची शक्यता नाही. भारतातील सुरक्षा परिस्थिती बदललेली नाही. आयसीसीने आम्हाला २४ तासांचा अल्टिमेटम दिला, पण अशी दडपशाही कोणतीही जागतिक संस्था करू शकत नाही.”
भारतावर अप्रत्यक्ष आरोप करत ते पुढे म्हणाले, “भारत आमच्या एका क्रिकेटपटूला सुरक्षा देऊ शकला नाही. तिथे क्रिकेट बोर्ड हा सरकारचाच भाग आहे. त्यामुळे दबावाखाली येऊन आमच्या खेळाडूच्या सुरक्षेबाबत ते अपयशी ठरले.”
दरम्यान, बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल 2026 साठी कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुस्ताफिझूर रहमानला वगळण्याचे निर्देश दिल्याचीही चर्चा आहे. याच मुद्द्यावरून बांगलादेश भारतावर सातत्याने आरोप करत आहे.
आयसीसीने मात्र ठाम भूमिका घेत स्पष्ट केले आहे की, टी20 वर्ल्ड कपमधील बांगलादेशचे सर्व सामने आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारतातच खेळवले जातील. बांगलादेशने माघार घेतल्यास ही त्यांची स्वतःची जबाबदारी असेल.
तय वेळापत्रकानुसार, बांगलादेशचा पहिला सामना ७ फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध, ९ फेब्रुवारीला इटलीविरुद्ध आणि १४ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध होणार होता. हे तिन्ही सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवले जाणार होते. १७ फेब्रुवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नेपाळविरुद्ध सामना नियोजित होता.
बांगलादेशने अखेर स्पर्धेतून माघार घेतल्यास, स्कॉटलंडला त्याचा थेट फायदा होणार आहे. सध्या स्कॉटलंड ही क्वालिफाय न होणाऱ्या संघांमध्ये सर्वोच्च क्रमांकावर आहे.
टी20 वर्ल्ड कप 2026 ही स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पार पडणार आहे. मात्र बांगलादेशच्या या “डरपोक” भूमिकेमुळे क्रिकेटविश्वात नवा वाद निर्माण झाला आहे.







