भारत-चीन-भूतान त्रिसीमा परिसरातील संपर्क आणि संरक्षण क्षमता अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने उत्तर बंगालमधील खुनिया मोड (चालसा) ते जलढाका या सुमारे १७ किलोमीटर लांबीच्या रणनीतिक रेल्वे मार्गाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. सुमारे २७२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे सीमावर्ती भागातील रेल्वे संपर्क सुधारण्याबरोबरच डुआर्स परिसरातील पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पासाठी तत्त्वतः मान्यता दिली असून, पावसाळ्यानंतर रेल्वे आणि पश्चिम बंगाल वन विभाग संयुक्तपणे या मार्गाचे सविस्तर सर्वेक्षण करणार आहेत. हा प्रस्तावित मार्ग जलपाईगुडी आणि कालिम्पोंग वन विभागाच्या हद्दीतून जाणार असल्याने पर्यावरणीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यासही या सर्वेक्षणात केला जाणार आहे.
दार्जिलिंगचे खासदार राजू बिस्ता यांनी सोशल मीडियावर या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, या रेल्वेमार्गामुळे भारत-चीन-भूतान त्रिसीमा परिसराच्या दिशेने रेल्वे संपर्क अधिक मजबूत होण्यास मदत होईल. तसेच जलढाका-बिंदू-तोडे टांगटा परिसरातील पर्यटनालाही नवी चालना मिळेल. त्यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्र सरकारचे आभार मानले.
या प्रकल्पाला सामरिकदृष्ट्याही विशेष महत्त्व आहे. डोकलाम त्रिसीमा क्षेत्राच्या जवळील हा परिसर भारताच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे या भागातील रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर केंद्र सरकार भर देत आहे.
याशिवाय, भारतीय रेल्वेने चालसा ते सीमावर्ती भागादरम्यान सुमारे २०० किलोमीटर लांबीच्या आणखी एका रणनीतिक रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार केला असून, त्यावर पुढील स्तरावर विचार सुरू आहे. हा मार्ग प्रत्यक्षात आल्यास सीमावर्ती भागातील नागरी तसेच संरक्षणविषयक दळणवळण अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
तसेच, सिक्कीममधील शिवोक-रंगपो रेल्वेमार्ग पुढे नाथू ला खिंडीपर्यंत विस्तारण्याचाही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. या उपक्रमांमधून चीन सीमेलगतच्या संवेदनशील भागात रेल्वे संपर्क मजबूत करण्यासाठी भारत टप्प्याटप्प्याने पायाभूत सुविधा विकसित करत असल्याचे दिसून येते.
हे ही वाचा:
चिन्मय कृष्ण दास यांना दोन प्रकरणांत जामीन; तुरुंगातून सुटकेची शक्यता नाही
‘आप’च्या माजी आमदारांचा मकोका प्रकरणात जामीन फेटाळला
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण सिंह निर्दोष
पाकिस्तानात रॅलीवर आत्मघाती हल्ला
विशेष म्हणजे, २०१७ मध्ये डोकलाम भागात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये तब्बल ७३ दिवस तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सीमावर्ती भागातील रस्ते, पूल आणि रेल्वे यांसारख्या रणनीतिक पायाभूत सुविधांच्या विकासाला भारताने अधिक गती दिली आहे.







