विरार येथे एका उघड्या राहिलेल्या मॅनहोल मध्ये पडून एका वृद्ध महिलेचा जीव गेल्याची घटना घडली आहे. ६८ वर्षीय महिला बेपत्ता झाल्यानंतर तब्बल १२ तासांनंतर तिचा मृतदेह विरारच्या एका गटारात सापडला. सोमवारी सकाळी मंदिरात दर्शनासाठी गेलेली विरार येथे राहणाऱ्या कमलाबेन शहा असे त्यांचे होते.
त्या पहाटे साडेपाचच्या सुमारास जवळच्या विमलनाथ जैन मंदिरात दर्शनासाठी घरातून निघाल्या होत्या.सकाळी ९ वाजेपर्यंत त्या न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना सांगितले, “ती सकाळी प्रार्थनेला गेली होती आणि सकाळी ८ च्या सुमारास निघून गेली”. तिचा शोध घेण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने, कमलाबेनच्या छायाचित्रांसह मेसेज कुटुंबीयांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले. सुमारे १२ तासांनंतर विरार (पश्चिम) येथील स्वामी नारायण मंदिराजवळ एका उघड्या मॅनहोलमध्ये मृतदेह आढळल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून सायंकाळी ६:३० च्या सुमारास मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. कुटुंबीयांनी सांगितले की कमलाबेन मंदिरात नियमित जात होत्या आणि त्यांना मार्ग माहित होता. परंतु डॉक्टरांनी पाठीच्या आजारामुळे त्यांना दोन आठवडे अंथरुणावर विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. सोमवारी शुभ दिवस असल्याने तिने मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. तिला गटारामध्ये पडताना पाहणारा कोणीही प्रत्यक्षदर्शी नव्हता. सिमेंटच्या गटारावरून चालत असताना ती अडखळून गटारा मध्ये पडली असावी, असा विरार पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
मुंबई-ठाण्यादरम्यान उभी राहणार सिनेसृष्टी
सुधा मूर्ती संभाजी भिडेंना भेटल्या आणि…
चार वर्षात दाऊदने भारतात पाठवले १३ करोड
भारत जोडोसाठी KGF-2 जोडो पडले महागातं
नागरी अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची गरज असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. अनेक महिन्यांपासून हे गटार उघडे असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. यापूर्वीही याच गटारामध्ये भटकी जनावरे पडल्याचे स्थानिकांनी सांगितले. “मॅनहोलमध्ये पडलेल्या किमान दोन ते तीन जणांना वाचवण्यात आम्ही मदत केली आहे. किमान आता तरी पालिकेने जागे होऊन ते झाकायला हवे,” असे प्राणी कार्यकर्ते मितेश जैन यांनी सांगितले. ते म्हणाले की वसई भागातील अनेक गटारांची झाकणे गायब आहेत आणि त्यामध्ये प्राणी आणि लोक पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. ज्या रस्त्यावर गटार आहे त्या रस्त्यावर पथदिवे नसल्याने सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर रस्ता धोकादायक ठरत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.