कॉफी बोर्ड ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, भारत हा जगातील सातवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश आहे आणि जागतिक कॉफी उत्पादनात सुमारे ३.५ टक्के योगदान देतो. याशिवाय, देशात दरवर्षी सुमारे ३.६ लाख टन कॉफीचे उत्पादन होते, ज्यातील जवळपास ७० टक्के कॉफी १२८ देशांना निर्यात केली जाते. यावरून भारतीय कॉफीची वाढती जागतिक मागणी स्पष्ट होते. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, कॉफी क्षेत्र हे भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे आधारस्तंभ आहे. या क्षेत्रातून शेती, प्रक्रिया आणि व्यापारात गुंतलेल्या दोन दशलक्षांहून अधिक लोकांचा उदरनिर्वाह चालतो.
भारतामधील कॉफी उद्योग प्रामुख्याने कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या प्रमुख कॉफी उत्पादक राज्यांमध्ये केंद्रित आहे. ही तीन राज्ये मिळून देशाच्या एकूण कॉफी उत्पादनातील सुमारे ९६ टक्के हिस्सा घेतात. त्यात कर्नाटक २,८०,२७५ मेट्रिक टन उत्पादनासह अग्रस्थानी असून, त्यापाठोपाठ केरळ आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. केंद्राच्या माहितीनुसार, भारत हा जगातील कॉफी निर्यात करणाऱ्या देशांमध्ये पाचवा क्रमांकाचा देश आहे आणि जागतिक कॉफी निर्यातीमध्ये भारताचा सुमारे ५ टक्के वाटा आहे. मागील ४ वर्षांपासून भारताची कॉफी निर्यात दरवर्षी १ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त राहिली आहे.
हेही वाचा..
ऑपरेशन सागर बंधु: कठीण काळात श्रीलंकेसोबत ठामपणे उभा भारत
बुरहानपूरच्या शिवमंदिरात तोडफोड
SIR ची कमाल; दिल्लीचा सलीम निघाला बरेलीचा ओमप्रकाश! नेमकं प्रकरण काय?
बनावट पासपोर्टवरून पळालेला गुंड थायलंडमध्ये पकडला
वित्त वर्ष २०२४-२५ मध्ये तर निर्यात विक्रमी १.८ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. यापूर्वीच्या १.२९ अब्ज डॉलरच्या तुलनेत ही जवळपास ४० टक्क्यांची मोठी वाढ आहे. जागतिक भू-राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवरही भारताची निर्यात यंदाच्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १.०७ अब्ज डॉलरवर पोहोचली असून, २०२५ च्या याच कालावधीच्या तुलनेत १५.५ टक्क्यांची वाढ दर्शवते. भारतीय कॉफीचे आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे आहे. भारतातून कॉफी निर्यात होणाऱ्या टॉप ५ देशांमध्ये इटली, जर्मनी, बेल्जियम, रशियन फेडरेशन आणि संयुक्त अरब अमिरातींचा समावेश आहे.
अलीकडेच केंद्राने कॉफी एक्स्ट्रॅक्ट, एसेंस आणि इन्स्टंट कॉफीवरील जीएसटी दर १८ टक्क्यांवरून कमी करून ५ टक्के केला आहे. हा निर्णय भारतातील कॉफी उद्योगासाठी मोठा दिलासा ठरत असून, देशांतर्गत बाजारपेठ वाढीस चालना मिळेल आणि प्रति व्यक्ती कॉफी सेवन वाढण्यास मदत होईल, असा अंदाज आहे. भारताची वेगाने वाढणारी कॉफी इंडस्ट्री पुढील काळातही अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अंदाजानुसार, २०२८ पर्यंत या संपूर्ण बाजारपेठेत ८.९ टक्के सीएजीआरने वाढ होईल. तसेच, कॉफी बोर्ड ऑफ इंडियाने २०४७ पर्यंत देशातील कॉफी उत्पादन ९ लाख टनांपर्यंत वाढवण्याचा मोठा ध्येयवजा संकल्प ठेवला आहे.







