केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर देशातील सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम बुधवारी देशांतर्गत बाजारात दिसून आला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर सोन्या-चांदीच्या दरांनी मोठी उसळी घेतली असून गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांनाही मोठा धक्का बसला आहे.
एमसीएक्सवर सोन्याच्या फ्युचर्समध्ये तब्बल ९,२०६ रुपयांची वाढ झाली आणि १० ग्रॅम सोन्याचा दर १,६२,६४८ रुपयांवर पोहोचला. त्याचवेळी चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून किलोमागे चांदी २,९५,८०५ रुपयांवर पोहोचली. काही ठिकाणी चांदीने ३ लाख रुपयांच्या दिशेने झेप घेतल्याचे चित्र दिसून आले. आयात शुल्क वाढीमुळे देशांतर्गत बाजारातील किंमती अधिक महाग झाल्या आहेत.
सरकारने हा निर्णय परकीय चलन साठ्यावर वाढत असलेला ताण कमी करण्यासाठी घेतल्याचे सांगितले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्या-चांदी आयातदारांपैकी एक देश असून देशातील मागणी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे. वाढत्या आयातीमुळे व्यापार तूट आणि रुपयावरील दबाव वाढत असल्याने केंद्राने कठोर पाऊल उचलले आहे. नव्या संरचनेनुसार १० टक्के बेसिक कस्टम ड्युटी आणि ५ टक्के Agriculture Infrastructure and Development Cess (AIDC) आकारण्यात आला आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्यात केली ५०% घट
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ
मुलायमसिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचे निधन
बांगलादेशने पाकिस्तानला धूळ चारली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांना एक वर्ष अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सरकार आयात शुल्क वाढवू शकते, अशी चर्चा सुरू होती. अखेर सरकारने मोठा निर्णय घेतल्याने बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे दागिन्यांची मागणी कमी होऊ शकते. मात्र गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळणाऱ्या लोकांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या माहितीनुसार, भारतातील गोल्ड ETF मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे.
दरम्यान, उद्योग क्षेत्रातून या निर्णयावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आयात शुल्क वाढल्यामुळे पुन्हा सोन्याची तस्करी वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. उच्च दरांमुळे बेकायदेशीर मार्गाने सोने आणण्याचे प्रमाण वाढू शकते, असे बुलियन बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.







