भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचतीचे आवाहन केल्यानंतर आपल्या ताफ्याचा आकार ५० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले असून, इराण युद्धाशी संबंधित आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर काटकसरी आणि इंधन बचतीच्या व्यापक मोहिमेचा भाग म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचे निर्देश विशेष सुरक्षा गटाला (एसपीजी) देण्यात आले आहेत. मात्र अनिवार्य सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, याचीही काळजी घेण्यास सांगितले आहे. एसपीजीने या निर्देशांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
सूत्रांनी असेही सांगितले की पंतप्रधान मोदी यांनी ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर करण्याचे निर्देश दिले असून, या बदलासाठी नवीन वाहने खरेदी करू नयेत, असे स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ
कांदिवली पूर्वमधील नाट्यगृहाचा मार्ग झाला मोकळा
भायखळ्यात पायात गोळी लागून युवक जखमी
सांगलीत मंदिराची भिंत कोसळून सहाजणांचा मृत्यू
जागतिक तेलाच्या वाढत्या किमतींमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक परिणामांना भारताला सामोरे जावे लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच मोदी यांनी नागरिकांना एका वर्षासाठी सोन्याची खरेदी टाळणे, अनावश्यक परदेश प्रवास पुढे ढकलणे आणि इंधनाचा वापर कमी करणे अशा काटकसरीच्या उपाययोजना स्वीकारण्याचे आवाहन केले होते.
काटकसरीच्या उपाययोजनांमध्ये स्वतः पुढाकार घेत पंतप्रधान मोदी यांनी गुजरात आणि आसामसह अलीकडील राज्य दौर्यांदरम्यान त्यांच्या ताफ्याचा आकार लक्षणीयरीत्या कमी केला आहे. हैदराबादमधील सभेत केलेल्या काटकसरीच्या आवाहनानंतर लगेचच वडोदरा आणि गुवाहाटी येथे कमी आकाराचे ताफे दिसून आले.
सूत्रांनी सांगितले की एसपीजीच्या अनिवार्य सुरक्षा प्रोटोकॉलचे पूर्ण पालन करत वाहनांची संख्या कमी करण्यात आली.
आता ही काटकसरीची मोहीम विविध सरकारे आणि मंत्रालयांमध्येही दिसू लागली आहे. अनेक केंद्रीय मंत्रालये इंधन बचतीच्या उपाययोजनांचा विचार करत आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही त्यांच्या अधिकृत ताफ्यांचा आकार कमी करण्याचे निर्देश देत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनीही या प्रयत्नांचा भाग म्हणून एस्कॉर्ट वाहनाचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी पुढे सांगितले.
मोदींचे काटकसरीचे आवाहन
रविवारी हैदराबाद येथे झालेल्या भाजपच्या सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी इराण युद्धाच्या आर्थिक परिणामांचा सामना करण्यासाठी आणि परकीय चलन साठा जपण्यासाठी नागरिकांनी काटकसरीचे उपाय स्वीकारावेत, असे आवाहन केले.
पंतप्रधानांनी पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर, मेट्रो रेल्वे सेवांचा अधिक वापर, कारपूलिंग, इलेक्ट्रिक वाहने आणि रेल्वे पार्सल सेवांचा वापर वाढवण्याचे आवाहन केले. शक्य असेल तेथे घरून काम करण्याच्या पद्धतीलाही त्यांनी प्रोत्साहन दिले.
परकीय चलन साठ्याचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी नागरिकांना एक वर्षासाठी सोन्याची खरेदी आणि अनावश्यक परदेश प्रवास पुढे ढकलण्याचे आवाहन केले. तसेच खाद्यतेलाचा कमी वापर, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करणे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आणि स्वदेशी उत्पादनांचा अधिक वापर करून आत्मनिर्भरता मजबूत करण्याचेही त्यांनी समर्थन केले.
पश्चिम आशियातील संकटाच्या परिणामांपासून नागरिकांचे संरक्षण करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगताना मोदी म्हणाले की इंधनाचा सुज्ञ वापर आणि खर्चकपात उपाययोजना जागतिक अनिश्चिततेच्या काळात अर्थव्यवस्था मजबूत करण्यास मदत करतील.







