नागपूरमध्ये सोमवारी औरंगजेबाच्या कबरीवरून हिंसाचार झाला. दोन गटात झालेल्या वादाला हिंसक वळण मिळून दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. या हिंसाचारात पोलिसांवरही दगडफेक झाली आणि काही पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले. मंगळवारी या घटनेचे पडसाद अधिवेशनात उमटले तर नागपूरमध्येही तणावपूर्ण शांतता होती. याच राड्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडल्याचेही उघड झाले आहे.
नागपूरमध्ये या हिंसाचारादरम्यान जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी जमावाविरोधात गणेशपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती उघड झाली आहे. काही हल्लेखोरांनी पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला. तर, त्याच ठिकाणी असलेल्या इतर महिला पोलिसांनाही जमावातून शिवीगाळ करण्यात आली, तसेच अश्लील शेरेबाजीही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूरमध्ये दगडफेक झाल्यानंतर शहरातील विविध भागांत कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचवेळी शहरातील भालदारपुरा भागातील एका गल्लीत दगडफेक करणारे, जाळपोळ करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू होता. तेव्हा तिथे बराच अंधार होता आणि त्याच अंधाराचा फायदा घेऊन जमावातील काहींनी त्या गल्लीत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जमावाविरोधात गणेशपेठ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
वांद्रेमधील गोडाऊनमधून २८६ किलो गांजा जप्त; इम्रान अन्सारीला अटक
ट्रम्प- पुतिन यांच्यात दोन तास चर्चा; युद्धबंदीवर काय झाले बोलणे?
स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलचे यशस्वी लँडिंग; सुनीता विल्यम्स २८६ दिवसांनी पृथ्वीवर परतल्या
वाहने पेटवली ती हिंदूंची, घटनेवेळी मुस्लिमांचे एकही वाहन पार्क नव्हते!
जाळपोळ, दगडफेक प्रकरणातील आरोपींना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा या आरोपींना कोर्टाने २१ पर्यंत पीसीआर दिला आहे. रात्री अडीच वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे. आतापर्यंत एकूण ४६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी ३६ आरोपींना काल पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं. सर्व आरोपींविरोधात गणेशपेठ आणि तहसील पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र एटीएसकडूनही नागपूर हिंसाचाराचा समांतर तपास सुरू आहे.







