मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील दिंडोशी परिसरात असलेल्या संतोष नगर भागात मरियम्मा देवीच्या शोभायात्रेदरम्यान राडा झाल्याची घटना समोर अली आहे. मुस्लिम गटांकडून हिंसक हल्ला झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) हिंसाचारात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींच्या अवैध घरांवर बुलडोझर चालवत तोडफोड केली. तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून संबंधित बांधकामे अवैध असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी बसून आंदोलन करत आहेत.
हा संपूर्ण वाद रविवारी (५ एप्रिल) संध्याकाळी उफाळून आला. संतोष नगर परिसरात मरियम्मा देवीची शोभायात्रा काढण्यात येत होती. त्यावेळी ज्योती बार अँड रेस्टॉरंटजवळ मुस्लिम समुदायातील काही लोकांनी शोभायात्रेत वाजत असलेल्या गाण्यांवर आक्षेप घेतला. हा वाद लवकरच हिंसक झटापटीत बदलला. मुस्लिम तरुणांनी शोभायात्रेत सहभागी भाविकांवर तलवारी आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले असून अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या.
घटनास्थळी उपस्थित पीडित आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई पोलिसांवर कारवाईस विलंब आणि टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव आणल्यानंतर अखेर मध्यरात्री ८ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेनंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. शोभायात्रेतील धार्मिक गाण्यांना विरोध करत दुसऱ्या गटाने हल्ला केल्याचा त्यांचा आरोप असून या हल्ल्यात त्यांच्या तीन कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बजरंग दलाने इशारा दिला आहे की, कारवाई केवळ दिखाव्यासाठी होत असल्यास ते पुन्हा आंदोलन करतील.
हे ही वाचा:
अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी १० ठिकाणी छापे
अमेरिकन वैमानिकाच्या सुटकेसाठी ३६ तासांची मोहीम; इराणमधून कसे काढले बाहेर?
गॅस सिलेंडर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४५ सिलेंडर आणि ३ दुचाकी जप्त
आपत्तीग्रस्त अफगाणिस्तानला भारताने दिला माणुसकीचा हात
दरम्यान, संतोष नगर परिसरात ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्याच ठिकाणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक हनुमान चालीसा पठण सुरू केले आहे. मात्र, हल्ल्यावेळी निष्क्रिय राहिल्याचा आरोप असलेल्या मुंबई पोलिसांनी आता कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता व्यक्त करत या पठणाला विरोध केला. यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तीव्र वादही झाला. पोलीस प्रशासनाने सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत आणि कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही.







