मुंबई : रेल्वे प्रवासादरम्यान झालेली साधी ओळख एका सरकारी कंपनीतील कर्मचाऱ्याला तब्बल ६८ लाख ६० हजार ९०० रुपयांना महागात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट शेअर ट्रेडिंग अॅप, व्हॉट्सअॅप ग्रुप आणि खोट्या नफ्याचे आमिष दाखवून ही संगनमताने करण्यात आलेली साइबर फसवणूक उघड झाली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
गोविंद श्रीधर परब (वय ५७), रा. बोरीवली पश्चिम, हे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत आहेत. सप्टेंबर २०२५ पासून ते गोरेगाव स्टेशनहून हार्बर मार्गे शिवडी येथील कार्यालयात ये-जा करत होते. याच काळात त्यांची रेल्वेत अमित पटेल नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्याने स्वत:ला शेअर ट्रेडिंगमधील यशस्वी गुंतवणूकदार म्हणून सांगत परब यांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले.
हे ही वाचा:
एअर इंडियाला १ कोटींचा दंड
गोवा विशेष: दाबोळीम विमानतळ कधीच बंद होणार नाही
हिमालयात सैन्यांचा महासंग्राम!
अमित पटेलने परब यांना ‘आरबीके ट्रेडिंग’ नावाचे मोबाईल अॅप डाउनलोड करण्यास सांगितले तसेच एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले. त्यानंतर अंकिता जैन आणि स्वत:ला ‘चीफ अॅनालिस्ट’ म्हणवणाऱ्या असीम शर्मा यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला गुगल फॉर्मद्वारे वैयक्तिक माहिती घेतली गेली. अॅपवर सुरुवातीला थोडा नफा दाखवून विश्वास संपादन करण्यात आला.
यानंतर डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण ६८,६०,९०० रुपये वर्ग करण्यास सांगण्यात आले. अॅपवर गुंतवणुकीवर तब्बल ६.८३ कोटी रुपयांहून अधिक नफा झाल्याचे दर्शविण्यात आले. मात्र, ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यावर ‘ब्रोकरेज फी’च्या नावाखाली आणखी ३४ लाख रुपये भरण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा परब यांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली.
व्हॉट्सअॅप ग्रुपमधील इतर सदस्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्व क्रमांक बंद असल्याचे आढळले. परब यांनी ६ फेब्रुवारी रोजी १९३० या सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली. त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर पोलिसांनी अमित पटेल, अंकिता जैन, असीम शर्मा, आरबीके अॅप डेव्हलपर्स तसेच ज्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा झाली त्या खातेदारांविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही एक संघटित सायबर फसवणूक टोळी असल्याचा संशय असून आंतरराज्यीय दुव्यांचाही तपास केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.







