जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याची बाब समोर आली आहे. यातील अनेक हल्ले हाणून पाडण्यात यश आले असून यामुळे आता सायबर युद्धाला तोंड फुटल्याचे बोलले जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसह विविध देशांमधील हॅकिंग गँगकडून भारतीय सिस्टमवर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले करण्यात आले आहेत. २२ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेच्या सायबर विभागाने डिजिटल हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्र सायबर सेलच्या ‘इकोज ऑफ पहलगाम’ या नवीन अहवालात असे दिसून आले आहे की २३ एप्रिलपासून देशात जवळपास १० लाख सायबर हल्ले झाले आहेत. हे सायबर हल्ले केवळ डेटा सेंटर किंवा वेबसाइट्सपुरते मर्यादित नसून देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांनाही थेट लक्ष्य करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले झाले. भारतीय वेबसाइट्स आणि पोर्टल्सना लक्ष्य करणारे हे हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्व, इंडोनेशिया आणि मोरोक्को येथून करण्यात आले. अनेक हॅकिंग गटांनी इस्लामी गट असल्याचा दावा केला आहे. यातील अनेक हल्ले महाराष्ट्र सायबरने हाणून पाडले अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे ही वाचा :
पंकजा मुंडेंना अश्लील संदेश पाठवणाऱ्या एकाला पुण्यातून अटक
कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या
राजधानीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत
बीएसएफने दहशतवादी कटकारस्थान उधळलं
प्रमुख हल्ला करणाऱ्या गटांमध्ये, पाकिस्तानस्थित ‘टीम इन्सान पीके’ आघाडीवर आहे, जो अॅडव्हान्स्ड पर्सिस्टंट थ्रेट (एपीटी) गट मानला जातो. या गटाने आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग, सैनिक कल्याण मंडळ आणि आर्मी पब्लिक स्कूलच्या वेबसाइटना लक्ष्य केले आहे. दुसरीकडे, भारतातील रेल्वे, बँकिंग आणि सरकारी पोर्टलसारख्या संवेदनशील प्रणाली गंभीर धोक्यात असून या अनेक संस्थांची सायबर सुरक्षा कमकुवत असल्याचे आढळून आले आहे, ज्याचा फायदा हॅकर्स घेत आहेत. सर्व सरकारी आणि खाजगी संस्थांनी रेड टीम असेसमेंट, डीडीओएस फेलओव्हर चाचण्या आणि सिस्टम ऑडिट सारखे उपाय करण्याचे सायबर पोलिसांनी सुचवले आहे.