पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अमृतसरजवळ ड्युटीसाठी जात असताना पंजाब पोलिसांच्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून राजकीय वातावरणही तापलं आहे. मृत पोलिस अधिकाऱ्याचं नाव जोगा सिंह असं असून ते पंजाब पोलिसांत सहाय्यक उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते.
रविवारी पहाटे जोगा सिंह हे ड्युटीसाठी घरातून निघाले होते. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. गोळ्या लागल्यानंतर ते गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
भारतीयांनी परदेश प्रवासावर लावला ब्रेक!
इराणकडून समृद्ध युरेनियम साठ्याचा त्याग करण्याची तयारी?
अमेरिका-इराण शांतता कराराची चांगली बातमी येणार?
१०० कोटींहून अधिक आरोग्य नोंदी ‘आयुष्मान भारत’ आरोग्य खात्यांशी जोडल्या
या घटनेनंतर अमृतसर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी घटनास्थळाभोवती सुरक्षा वाढवली असून सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला की त्यामागे कोणतं मोठं गुन्हेगारी रॅकेट आहे, याचाही तपास सुरू आहे. पोलिसांनी रोड रेज, जुनं वैर आणि नियोजित कट अशा सर्व शक्यतांचा तपास सुरू केल्याचं सांगितलं आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, या घटनेनंतर पंजाबच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया यांनी मुख्यमंत्री भगवंत मान सरकारवर जोरदार टीका केली. “राज्यात पोलिस अधिकारीच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांची सुरक्षा कोण करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंजाबमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून सरकारकडून कायदा आणि सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मजीठिया यांनी पंजाब पोलिस प्रशासनावरही निशाणा साधला. राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं सांगत त्यांनी पोलिस दलावर वाढत्या दबावाबाबत चिंता व्यक्त केली. राज्य सरकार केवळ जाहिराती आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त असून प्रत्यक्ष सुरक्षेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
गेल्या काही महिन्यांत पंजाबमध्ये पोलिसांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्याने सुरक्षा यंत्रणांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः सीमावर्ती भागात गुन्हेगारी आणि शस्त्रास्त्र तस्करीच्या घटना वाढल्याचं चित्र समोर येत आहे. त्यामुळे अमृतसरमधील या घटनेनंतर पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.







