महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआयआर) दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथील एका सोन्याचे दागिने तयार करणाऱ्या कारखान्यावर छापे टाकले,या छापेमारीत धक्कादायक खुलासा झाला आहे, या कारखान्यात तस्करी करून आणलेले सोनं वितळवून त्याच्या लगड तयार करण्यात येत होते अशी माहिती समोर आली आहे. डीआयआर च्या कारवाईने सोन्याचा छुप्या पद्धतीने चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेट उध्वस्त करण्यात आले आहे.
काळबादेवी भागात चालणाऱ्या या कारखान्यात तस्करी करून आणलेले सोने वितळवून स्थानिक बाजारात विकले जात होते. या कारवाईत डीआयआर ने कारखान्याच्या मालकांसह ११ जणांना अटक केली असून, सुमारे २३ कोटी रुपये किमतीचे १२ किलो सोने आणि ९ किलो चांदी जप्त केली आहे. डीआयआरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीआयआर च्या अधिकाऱ्यानी काळबादेवी येथील जमनादास हवेलीच्या सहाव्या मजल्यावर छापा टाकला. अत्यंत गुप्तता पाळून चालवण्यात येणाऱ्या या कारखान्यात पियुष कुमार, विक्रमभाई रबारी, वीरेश कदम आणि कपिल देव चौहान यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी अधिकारींनी मोठ्या प्रमाणात सोन्याचे आणि चांदीचे बार जप्त केले.
चौकशीदरम्यान, ताब्यात घेतलेल्यांनी धक्कादायक माहिती दिली की, ही जागा निहार ठक्कर आणि सूरज नरळे यांची असून, ते या ठिकाणी तस्करी केलेले सोने वितळवण्याचे काम करत होते. निहार ठक्कर आणि सूरज नरळे यांच्याकडे ५.१ कोटी रुपयांचे ४ किलोपेक्षा जास्त सोने आणि १३.८ लाख रुपयांचे ८.८ किलो चांदी आढळले. मात्र, या मालाच्या मालकीबाबत कोणतेही कायदेशीर कागदपत्रे सादर करता न आल्याने या दोघांना तातडीने अटक करण्यात आली.
हे ही वाचा:
“पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल” पाक संरक्षण मंत्री असे का म्हणाले?
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून डिस्चार्ज
१९ ऑक्टोबरलाच लीड मिळाला होता…सिंदूर २.० चे संकेत; अल फलाहचा चेअरमनच दाखलेबाज
फक्त ५५ धावांत कोसळली दक्षिण आफ्रिका!
माझगाव आणि मुंबादेवीतही छापे
या तस्करांच्या चौकशीतून डीआयआर ला आणखी दोन ठिकाणांची माहिती मिळाली.माझगाव येथील दुसऱ्या ठिकाणी छापा टाकून आकाश केसरकर आणि सुशील जोशी यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २.४ कोटी रुपयांचे २.३ किलो सोने जप्त करण्यात आले.
मुंबादेवी (राजबाग) माझगावच्या आरोपींच्या माहितीवरून डीआयआर ने मुंबादेवी येथील राजबाग परिसरात तिसरा छापा टाकला. येथे सूरज जोशी, गोलू रे, सत्या त्रिपाठी आणि विपुल ठक्कर यांना अटक करण्यात आले, तसेच सुमारे ७ कोटी रुपयांचे ५.५ किलो सोने जप्त करण्यात आले.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “अटक करण्यात आलेले सर्व आरोपी तस्करी करणाऱ्या सिंडिकेटसाठी सोने वितळवण्याचे काम करत होते. तस्करी केलेले सोने कॅप्सूल, धूळ, पेस्ट किंवा सोन्याच्या बारच्या स्वरूपात आणले जात होते.” या तस्करांनी कस्टम ड्युटी चुकवून ५.३ कोटी रुपयांचा मोठा महसूल बुडवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अटक करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपीची भूमिका वेगळी होती. मात्र, निहार ठक्कर आणि सूरज नरळे यांनी या संपूर्ण भागीदारीमध्ये तसेच सोन्याच्या ब्रँडिंगमध्ये मोठी गुंतवणूक करून महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. डीआयआर आता या सिंडिकेटला अर्थपुरवठा करणारे (फायनान्सर्स) आणि हवाला ऑपरेटर्ससह इतर व्यक्तींचा शोध घेत आहे.







