30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरसंपादकीयदा फडणवीस कोड...

दा फडणवीस कोड…

मविआच्या काळातील कट-कारस्थानांची आठवण फडणवीसांना कुठेतरी अस्वस्थ करत आहे

Google News Follow

Related

‘दा विंची कोड’, नावाचा एक सिनेमा आला होता. डॅन ब्राऊन यांच्या याच नावाच्या पुस्तकावर बेतलेला हा सिनेमा म्हणजे एक अफाट रहस्यपट आहे. शेवटच्या काही पानात हे रहस्य उलगडते. काल फडणवीसांची एका चॅनलवर मुलाखत ऐकली. त्यात ‘काही विषय मी राखीव ठेवले आहेत, त्यावर वेळ आल्यावर बोलेन’, असे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीसांचे वक्तव्य सूचक होते, त्यात अनेक रहस्यांची बीज दडलेली आहेत. हा ‘दा फडणवीस कोड’ महाराष्ट्रातील राजकारणातला सस्पेन्स वाढवणारा आहे.

डॅन ब्राऊनच्या त्या पुस्तकात या दा विंची यांच्या अत्यंत गाजलेल्या मोनालिसा या चित्राबाबत असलेल्या गुढाचे तपशीलवार वर्णन आहे. हे चित्र गाजण्याचे कारण म्हणजे या चित्रातील मोनालिसा मनात चेहऱ्यावर गुढ स्मित आहे, कारण ती मनात अनेक गुपित दडवून बसली आहे. फडणवीस अशीच अनेक गुपित मनाच्या खोल कप्प्यात दडवून आहेत. त्यांनी या मुलाखतीत अशाच काही गुपितांचा ओझरता उल्लेख केला. परंतु त्यामुळे गुढाचा गुंता अधिक वाढला आहे.

‘मला अटक करण्याचा प्रयत्न झाला. माझ्या परिवाराला आय़ुष्यातून उठवण्याचे प्रयत्न झाले’, असा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी केला. मविआला पुढील २५ वर्षे सत्तेची स्वप्न पडत होती. परंतु फडणवीस समोर उभे असल्यामुळे हे सरकार पाच वर्षही पूर्ण करण्याची हमी नव्हती. फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह अस्त्रामुळे सरकारला हादरे बसत होते. सरकारची सूत्र हाती असताना आधी मविआचे मोहरे आणि नंतर नेते गजाआड जात होते. सरकारवर अस्थिरतेचे ढग जमा झाले होते. त्यामुळे काहीही करून फडणवीसांचा बाजार उठवल्याशिवाय सरकारला स्थिरता येण्याची शक्यात नव्हती. त्यातून कोणत्याही परिस्थितीत फडणवीसांना नामोहरम कऱण्याचा डाव शिजला असावा.

हे ही वाचा:

सीबीआयकडून निवृत्त न्यायमूर्तींचा भ्रष्टाचार उघड

पुढल्या वर्षांपासून मेट्रो नऊ  सुरु होणार  

आव्हाडांचे घालीन लोटांगण कशासाठी?

नामांतराची प्रक्रिया सोमवारपर्यंत पूर्ण होईल

 

त्यांचे कच्चे दुवे हाती लागले नसल्यामुळे त्यांच्या परिवाराला लक्ष्य बनवण्यात आले असावे. परंतु नेमके काय घडले, याचा अंदाज बांधणे कठीण, परंतु काही तरी भयंकर शिजत होते हे निश्चित. ‘अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मला आणि माझ्या परिवाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. कुभांड रचण्यात आलं, बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला, त्यातल्या काही काही गोष्टी झाल्याही, परंतु योग्य वेळी लक्षात आल्यामुळे ते आपण थांबवू शकलो.’

फडणवीसांचा परीवार म्हणजे त्यांच्या पत्नी अमृता आणि कन्या. त्यांच्या खासगी आयुष्यावर बालंट आणण्याचा प्रयत्न केला असेल तर ही बाब फारच गंभीर आहे. मविआच्या राजवटीत विरोधकांकडून झालेले त्यांचे ट्रोलिंग भयंकर होते. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला अत्यंक शेलक्या आणि घाणेरड्या टीकेला सामोरे जावे लागले. उभयतांनी ही टीका अत्यंत विखारी आणि विषारी टीका पचवली. परिवारावर होणारी टीका सहन करण्यासाठी घट्ट काळीज लागते. फडणवीस हे राजकारणी आहेत, अमृता फडणवीस यांचा राजकारणाशी संबंध नाही. परंतु त्यांनीही या टीकेला भीक घातली नाही.

‘पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा बदला घेतला’, असे जेव्हा फडणवीस म्हणाले तेव्हा त्यांनी बदला हा शब्द वापरल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले होते. कारण उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे फडणवीसांचा स्वभाव सूडबुद्धी नाही. राजकीय विरोधक आणि शत्रू यातला भेद त्यांना कळतो. ‘महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली कटूता कमी करण्याची गरज आहे’, असे फडणवीस म्हणाले होते. परंतु मविआच्या काळातील कट-कारस्थानांची आठवण त्यांना कुठे तरी अस्वस्थ करत असल्याचे, त्यांच्या विधानांवरून लक्षात येते.

पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरही ते बोलले. पहाटेचा शपथविधी झाल्यामुळे राष्ट्रपती राजवट हटली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, असे पवार म्हणाले होते. परंतु राज्यात राष्ट्रपती राजवट का आणि कुणाच्या सल्ल्याने आली होती, असा प्रतिप्रश्न करून फडणवीसांनी या विषयातील सस्पेंस वाढवला आहे.

पहाटेचा शपथविधी आणि महाविकास आघाडी सरकार येण्यामध्येही अनेक टर्न आणि ट्विस्ट आहेत. त्याबद्दलही मी आता काही बोलणार नाही, वेळ आल्यावरच मी या विषयावर बोलेन असे फडणवीस म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी करण्यात आलेल्या राजकीय खेळी, हे सरकार स्थापन झाल्यानंतरचा अडीच वर्षांचा काळ, एकनाथ शिंदे यांचे बंड, शिंदे फडणवीस सरकारची स्थापना या सर्व घडामोडींचा पट एखाद्या पोलिटीकल सस्पेंस थ्रीलर सिनेमासारखा आहे.

पडद्या मागे चाललेले राजकारण आणि जनतेसमोर येते ते चित्र यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सार्वजनिक जीवनात एकमेंकांशी छान गप्पा करणारे प्रत्यक्षात एकमेकांच्या उरावर बसलेले असतात. गळ्यात गळा घालणारे गळा कापण्याची संधी शोधत असतात. एकाचे बळ जितके वाढेल तितकेच दुसऱ्याचे बळ घटत असते.

महाराष्ट्राच्या या कथानकात अनेक पात्र आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावरची पकड संपत चाललेला शरद पवारांसारखा नेता, गाळात गेलेली काँग्रेस, मुख्यमंत्री पदासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेला परंतु कर्तृत्वहिन असलेले उद्धव ठाकरे. आज तरी फडणवीस या सर्वांना पुरून उरले आहेत. फडणवीसांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचे महत्त्व तीळा तीळाने घटते आहे. हा माणूस आपले दुकान बंद करायला चालला आहे, याची जाणीव झाल्यामुळे विरोधक फडणवीसांना रोखण्याचा नाही तर संपवण्याचा प्रयत्न करत होते. खेदाची बाब म्हणजे त्यासाठी फडणवीसांच्या परिवारालाही यात ओढण्याचा प्रय़त्न झाला. नेमके काय घडले याची उकल होत नाही तोवर लोकांना हे सस्पेंस छळत राहाणार.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा