31 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरसंपादकीयआधी झालेले विसरा, म्हणजे नेमकं काय?

आधी झालेले विसरा, म्हणजे नेमकं काय?

उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणाऱ्या मुस्लीमांमध्ये साबीर शेख किती?

Google News Follow

Related

उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात मुस्लीम मतदारांशी संवाद साधला. लोटांगणच घातलं म्हणा. आधी झालेले विसरा, देशाचे संविधान वाचवण्यासाठी आपण एकत्र येऊया अशी साद घातली. आधी झालेले म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या काळातले, असे त्यांना म्हणायचे आहे का? शिवसेना भवनात उपस्थित असलेल्या रिझवान कुरेशी याने उद्धव यांची धोरणे शिवसेनाप्रमुखांपेक्षा वेगळी आहेत, ते पुरोगामी आहेत, असे सर्टीफिकेटही देऊन टाकले.

उद्धव ठाकरे आणि मुस्लिम बांधवांच्या या संवादाचे सविस्तर वृत्त विविध माध्यमांमध्ये आलेले आहे. उद्धव ठाकरे संविधान वाचवण्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुस्लिमांचा पाठिंबा मागतायत. या मुस्लिमांनी सोबत येण्यासाठी उद्धव ठाकरे त्यांच्या कट्टरवादाला कुरवाळणार आहेत की मुस्लिम बांधव हिंदुत्वाला पाठींबा देणार आहेत, हे स्पष्ट झाले पाहिजे.

उद्धव ठाकरे मुस्लीमांना भेटले यात काहीच गैर नाही. परंतु भेटून लोटांगण घातले हे मात्र वाईट. हिंदुत्व आम्हाला शिकवू नका असे ठाकरे वेळोवेळी भाजपाला सांगत असतात. मुस्लिमांना त्यांनी जर हेच सांगितले असते की आम्ही हिंदू आहोत. हिंदुत्व हाच राष्ट्रवाद आहे, अशी आमची भूमिका आहे. आपण एकत्र येऊया आणि देशाचे भले करूया तर उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत केले असते. पण आधी झाले ते विसरा असे उद्धव ठाकरे म्हणतात, त्याचा अर्थ जाणून घेण्याची गरज आहे.

भाजपा नेते सुद्धा मुस्लिमांना सोबत येण्याचे आवाहन करतात. सब का साथ सबका विकास ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिकाच आहे. परंतु त्यासाठी त्यांना हिंदुत्वाची व्याख्या बदलून अजान स्पर्धा भरवण्याची गरज वाटत नाही. भाजपाने कलम ३७० हटवले, राम मंदीर उभारले, राम-कृष्ण हे आपले पूर्वज आहेत, अशी भूमिका मांडली. कट्टरवाद्यांच्या दबावाला भीक न घालता सीएए कायदा आणला. समान नागरी कायदा आणणार, अशी घोषणा संकल्पपत्रात केलेली आहे. या भूमिकेसह ते मुस्लीमांना सोबत या असे आवाहन करतायत.

उद्धव ठाकरेंचे नेमके उलट आहे. त्यांनी राम मंदिराबाबत सतत तोंड मुरडले. अलिकडे पालघरमध्ये त्यांची सभा झाली तेव्हा समोर लाल आणि हिरवे झेंडे पाहून माझ्या तमाम बांधवांनो, मातांनो असे म्हणाले. हिंदू हा शब्द त्यांनी गिळला. किंवा त्यांच्या तोंडून हा शब्द फुटलाच नाही, असे म्हणता येईल. उघडपणे अशी मुस्लीम धार्जिणी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. बघा माझी भूमिका अजिबातच हिंदूत्ववादी नाही, असे म्हणत ते मुस्लीम मतदारांना डोळा मारत आहेत. मतांसाठी आर्जव करीत आहेत. ही भूमिका मुस्लीमांना सुद्धा पटलेली आहे, असे या मुस्लीम संवादाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर लक्षात येते. दक्षिण मध्य मुंबईत उबाठा शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांना विजयी करण्याचे आवाहन ठाकरे यांनी केलेले आहे.

याच पालघरमध्ये साधूंचे भीषण हत्याकांड झाले होते, त्याचीही ठाकरेंना आठवण झाली नाही. समोर कट्टर हिंदू असतील तेव्हा मी हिंदुत्व सोडले नाही, असे म्हणायचे आणि समोर मुस्लिम असतील तेव्हा संविधान वाचवण्याची भाषा करायची असा दुटप्पीपणा ठाकरे करतात. झाले गेले विसरून जावे… असे गाणे म्हणताना शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व विसरा, मी ते कधीच विकलेले आहे, असे ठाकरे सांगत फिरतायत. १९९२ च्या दंगलीत हिंदूंना शिवसैनिकांनी वाचवले, असा दावा उद्धव ठाकरे यांनी अनेकदा केलेला आहे. हिंदूंना जात्यांध आणि कडव्या मुस्लिमांपासून वाचवले असे सांगण्याचे धाडस त्यांच्यात आता उरले आहे का ?

हे ही वाचा:

भाजपकडून उमेदवारांची १२वी यादी जाहीर, साताऱ्यातून उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब!

दिनेश कार्तिक बनणार टीम इंडियाचा फिनिशर?

‘स्वतः आंबेडकरही भारताचे संविधान बदलू शकत नाहीत’!

सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याच्या हत्येप्रकरणी पाककडून भारतावरच आरोप!

मतांसाठी थुंकी गिळण्याचे काम ठाकरे करतायत. हिंदू मतदार आपल्याला भीक घालणार नाही याची त्यांनी इतकी खात्री आहे की ते मुस्लिमांकडे भिकेचा कटोरा फिरवतात. त्यासाठी संविधानाची ढाल पुढे करतायत. शिवसेनाभवन येथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना एकदा त्यांनी विचारून तरी घ्यायला हवे होते की त्यांना संविधान हवे की शरीया? यात मुस्लीम धार्जिण्या भूमिकेमुळे मविआच्या सत्ता काळात हिंदू हा सडलेला धर्म असल्याची गरळ ओकून शर्जील उस्मानी सारखा जातीयवादी भामटा कोणतीही कारवाई न होता इथून बाहेर पडू शकला.

अमेठीतला हिंदू मतदार आपल्याला उभा करणार नाही याची जाणीव झाल्यामुळे मुस्लीम बहुल वायनाडमध्ये पळून जाणारे राहुल गांधी आणि मुस्लीमांसमोर मतांसाठी झोळी पसरणारे उद्धव ठाकरे यांच्यात फरक तरी कुठे उरला? माझा बाप चोरला असे जिथे तिथे बोंबलत फिरणाऱ्या ठाकरेंना बापाचा विचार गहाण टाकताना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती. साबीर शेख हे पहील्या भाजपा शिवसेना सरकारमध्ये कामगार मंत्री होते. मंत्री राहील्यानंतर सुद्धा हा माणूस फाटका राहिला. त्यांचे हिंदुत्व कुठल्याही कट्टर शिवसैनिकापेक्षा कमी नव्हते. बाळासाहेबांना साबीर शेख यांचा अभिमान होता.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणाऱ्या मुस्लीमांमध्ये असे साबीर शेख किती आहेत? रिझवान कुरेशी हा युनियन लीडर या गर्दीत उपस्थित होता. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे नाहीत, ते पुरोगामी आहेत, असे तो म्हणाला. लोकमत ने दिलेल्या वृत्तात ही प्रतिक्रिया सविस्तर आलेली आहे. हे जर सत्य असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार तरी काय वेगळे बोलत होते? हिंदूंच्या श्रद्धास्थानांची खिल्ली उडवणे, हिंदूंना अपमानित करणे आणि मुस्लिमांसोबत लाळ गाळत फिरणे हे पुरोगाम्यांचे वैशिष्ट्य. महाराष्ट्रातला पुरोगामी नेते कोण तर शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आज शरद पवारांच्या रांगेत उभा राहिला. तो हिंदुत्वावादी नाही, यावर मुस्लिमांचा ठाम विश्वास आहे. बरे झाले एकनाथ शिंदे यांच्याकडे आज शिवसेना आहे. नाही तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना जनाब बालासाहाब जाहीर करून त्यांच्या नावाने उरूस भरवायला सुरूवात केली असती.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा