सुमारे दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कूटनीतिक तणावानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध सामान्य करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. दोन्ही देश व्हिसा सेवा पूर्णपणे पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेत असून, त्यामुळे नागरिकांच्या प्रवासाला आणि द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे. माहितीनुसार, बांग्लादेशने भारतीय नागरिकांसाठी सर्व श्रेणींमध्ये व्हिसा देणे पुन्हा सुरू केले आहे. तर भारतही टप्प्याटप्प्याने व्हिसा सेवा पूर्ववत करण्याच्या दिशेने काम करत आहे. बांगलादेशचे नवी दिल्लीतील उच्चायोग तसेच कोलकाता, अगरतळा, मुंबई आणि चेन्नई येथील वाणिज्य दूतावास पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले आहेत.
बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री खलीलुर रहमान यांनी भारत दौरा केल्यानंतर या प्रक्रियेला गती मिळाली. या दौऱ्यात व्हिसा सेवा पुनर्संचयित करणे हा प्रमुख मुद्दा होता. बांगलादेश उच्चायुक्त रियाझ हमीदुल्लाह यांनी सांगितले की, “डिसेंबरमध्ये काही केंद्रांवर व्हिसा सेवा तात्पुरती थांबवण्यात आली होती, मात्र फेब्रुवारीमध्ये ती पुन्हा सुरू करण्यात आली.” ऑगस्ट २०२४ मधील घडामोडींनंतर दोन्ही देशांच्या संबंधांत तणाव निर्माण झाला होता. तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना विद्यार्थी आंदोलनाच्या आडून सत्तेतून हटवण्यात आल्यानंतर अंतरिम सरकार स्थापन झाले, ज्याचे नेतृत्व मुहम्मद युनूस यांनी केले. त्यानंतर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी सत्तेत आल्यानंतर संबंध सुधारण्याचे प्रयत्न वाढले.
माहितीनुसार, व्हिसा सेवा पूर्णपणे सुरळीत झाल्यानंतर दोन्ही देश आर्थिक सहकार्य, व्यापार आणि ऊर्जा संपर्क यांसारख्या क्षेत्रांमध्येही भागीदारी वाढवण्यावर भर देतील. विशेष म्हणजे, यावर्षीच्या सुरुवातीला इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या काळात भारताने बांगलादेशला डिझेलचा पुरवठाही केला होता. सुरक्षा कारणांमुळे मागील वर्षी बांगलादेशी नागरिकांसाठी व्हिसा सेवा काही प्रमाणात प्रभावित झाली होती, मात्र ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली नव्हती. वैद्यकीय किंवा कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीसारख्या विशेष प्रकरणांमध्ये व्हिसा दिले जात होते.
हे ही वाचा:
सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करणे मूलभूत अधिकार नाही
इस्लामाबादमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरचा मृतदेह सापडला
एकाचवेळी सर्वांचे फोन वाजले, मोबाईलवर आला अलर्ट! नेमकं प्रकरण काय?
बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल तर मुलींची बाजी!
दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी अलीकडील मुलाखतीत भारत- बांगलादेश संबंध सुधारू नयेत, अशी भूमिका व्यक्त केली होती. भारतात बांग्लादेशी घुसखोरी ही मोठी समस्या असल्याचे त्यांनी म्हटले असून, दोन्ही देशांदरम्यान प्रत्यार्पण करार नसल्यामुळे अवैधरित्या भारतात राहणाऱ्यांना परत पाठवणे कठीण जात असल्याचे त्यांनी नमूद केले.







