पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जशास तसा बदला घेण्यासाठी केंद्र सरकार आणि लष्कराचे प्रयत्न सुरु असतानाच काँग्रेस आणि भांडूपचा भोंगा पाकिस्तानची भाषा बोलत आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी उबाठा खासदार संजय राऊतवर केली. आज (५ मे) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र आणि भारतविरोधी बोलणाऱ्या राऊतचा निषेध करावा, असे आवाहन निरुपम यांनी जनतेला केले.
निरुपम पुढे म्हणाले, पाकिस्तानाला पहलगाम हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. पाकिस्तानला घेरण्याची रणनिती सरकारकडून केली जात आहे. पाकिस्तानशी आयात बंदी लागू केली आहे. पाणी बंद केले आहे. समुद्री व्यापार बंद केला आहे. वायू सेनेकडून युद्धाभ्यास सुरु आहे. सिंधू जल करार स्थगित केला असून आता चिनाब आणि झेलम नदीवर धरणे बंद करुन पाकिस्तानची कोंडी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करतील, असे निरुपम म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, भांडूपचा भोंगा बोगस माणूस संजय राऊत म्हणाले की ते हुकुमशाही विरोधात लढतो, मात्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत युती करण्यासाठी उबाठाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट निरुपम यांनी केला. उबाठा खासदार भाजपकडे जाण्याच्या तयारीत असताना सर्व खासदारांना उद्धव ठाकरेंनी त्यांना रोखले होते. भाजपसोबत बोलणी सुरु असून आपण सर्वच भाजपबरोबर जाऊ, अशी गळ उबाठाने खासदारांना घातली होती, मात्र भाजपकडून उबाठासाठी दरवाजे बंद आहेत, असे निरुपम म्हणाले.
हे ही वाचा :
‘पाकवर हल्ला कधी होणार’ या प्रश्नामागचा अर्थ समजून घ्या…
एअरगनने दोन डझनहून अधिक माकडांची हत्या!
महाकुंभमधील रुपवती हर्षा रिछारियाने लग्नाचा प्रस्ताव देणाऱ्या अस्लमला दिली तंबी
संरक्षण सचिवांच्या पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत काय घडलं ?
भांडूप भोंग्याने कालच लाडकी बहिण योजना बंद झाली अशी धडधडीत खोटी माहिती जनतेला दिली. राऊत यांना खोटं बोलण्याची, खोटा प्रचार करण्याची सवय झालीय, अशी टीका निरुपम यांनी केली. लाडकी बहिण योजना सुरु असून त्यांना दरमहा पैसे देण्यास सरकार कटिबद्ध आहे. लाडकी बहिण योजना कोणीही बंद करु शकत नाही. तसेच आता १५०० रुपये देत आहेत भविष्यात त्यांना २१०० रुपये देण्याचा शब्द शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करतील, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला.