शनिवारी रात्री मुंबईच्या पावसाने रौद्र रुप धारण करत साऱ्या शहराला झोडपून काढले. या संपूर्ण पावसात मुंबईत तीन ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या असून एकूण २४ जणांचे जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. या मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र सरकारने किमान दहा लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी ने केली आहे.
मुंबईतील पावसाच्या हाहाकारात चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप या भागात अपघाताच्या घटना घडल्या असून भिंत कोसळून लोकांना जीव गमवावे लागले. यात सर्वाधिक नुकसान चेंबूर भागात झाले असून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मुंबई प्रभारी अतुल भातखळकर आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी चेंबूर येथील अपघातग्रस्त भागाला रविवारी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील पिडीत रहिवाशांचे सांत्वन केले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर हल्ला चढवला आहे.
हे ही वाचा:
चेंबूरच्या किंकाळ्या आधी ‘दिल्लीत’ नंतर ‘मुंबईत’ ऐकू आल्या!
विकिपीडियावर विश्वास ठेवू नका…साईटवर डाव्यांचा कब्जा
पावसाच्या हाहाकाराने मुंबईत अपघातांची मालिका
‘या’ शिवसेना नेत्यामागेही लागला ईडीचा ससेमिरा
मुख्यमंत्र्यांनी या अपघातात मृत पावलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. पण ही पाच लाख रुपयांची मदत ही अतिशय फुटकळ आहे असा घणाघात भातखळकर यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना किमान दहा लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुसळधार पावसामुळे चेंबूर येथे मोठी जीवितहानी झाली. मी आणि @BJP4Mumbai चे अध्यक्ष @MPLodha यांनी घटनास्थळी भेट देऊन रहिवाशांना सांत्वना दिली. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना दिलेली ५ लाखांची मदत फुटकळ असून ही रक्कम किमान १० लाख करावी अशी आमची मागणी आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 18, 2021
तर येत्या २४ तासांत अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्यामुळे चेंबूर येथील दुर्घटनाग्रस्त भागातील इतर रहिवाशांना समोरच्या महापालिकेच्या शाळेत हलविण्यात यावे यासंबंधी मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली आहे. तर ज्यादा मनुष्यबळ लावून चेंबूर दुर्घटनेतील ढिगारे आणि चिखल तातडीने उपसण्यात यावे अशी विनंती केली आहे.
येत्या २४ तासात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे महापालिका आयुक्तांशी याबाबत चर्चा करून येथील उर्वरित रहिवाशांना तातडीने समोरच्या शाळेत हलवावे, ज्यादा मनुष्यबळ लावून येथील ढीगारे आणि चिखल तातडीने उपसण्यात यावा अशी विनंती केली. pic.twitter.com/4rxizXBE59
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 18, 2021