छत्तीसगडच्या काँग्रेस नेत्या राधिका खेडा यांनी पक्षाची साथ सोडली आहे. छत्तीसगड काँग्रेसचे एक नेते सुशील आनंद शुक्ला यांनी त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह रायपूरच्या पक्षकार्यालयात त्यांच्याशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा याबाबत त्यांनी वरिष्ठ नेत्यांना कळवले, तेव्हा आरोपी नेत्यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. इतकेच नव्हे तर. राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि जयराम रमेश सर्वांना या घटनेबाबत कळवूनही या आरोपी नेत्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडा न्याय यात्रेदरम्यान जेव्हा मी कोरबामधील ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तेव्हा सुशील आनंद शुक्ला मी कोणत्या खोलीमध्य थांबली आहे, हे विचारण्याचा प्रयत्न करत होते. मला कोणते मद्य पाठवावे, असे विचारले जात होते. दोन मुलीही याच्या साक्षीदार आहेत. हे अतिशय अपमानास्पद होते. याबाबत मी तेव्हाच पक्षनेत्यांना कळवले होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही, असे राधिका यांनी सांगितले.
राम मंदिर उभे राहिल्यानंतर मी देखील रामाचे दर्शन घेऊ इच्छित होते. मी २७ मार्चला अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेतले. त्याचे छायाचित्र मी सोशल मीडियावर टाकले. मात्र त्यानंतर काँग्रेसचे अनेक मोठ्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतला. मी रामाचे दर्शन घेतल्यानंतर मला चार शब्द सुनावले गेले. त्या दिवसापासून माझा सातत्याने छळ केला जात आहे, असा आरोप राधिका यांनी केला.
छत्तीसगड काँग्रेसच्या मुख्यालयात नेमके काय घडले, हे त्यांनी सांगितले. ’३० एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता मी कार्यालयात काहीतरी काम करत होते. त्याचवेळी छत्तीसगड काँग्रेसचे प्रवक्ते सुशील आनंद शुक्ला यांनी त्यांचे दोन साथीदार नितिन भन्साली आणि सुरेंद्र वर्मा यांच्यासोबत खोलीत आले. ते दोघेही छत्तीसगड काँग्रेसचे प्रवक्ते होते. एकाने मागून खोली बंद केली. दरवाजा कोणी लावला, हे मी बघू शकले नाही. आवाज आल्याच क्षणी मी फोन काढला आणि कॅमेरा सुरू केला. मी आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यानंतर मी बाहेर येऊन याबाबत सर्वांना सांगितले. मात्र, कोणीच कारवाई केली नाही. सहा दिवस लोटूनही याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने मी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला,’ असे राधिका यांनी सांगितले.
प्रियांका गांधी यांनीही न्याय देण्यासाठी काहीही न केल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मी ट्वीट करून प्रियांका गांधी यांना टॅग केले होते. मात्र काहीच नाही झाले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसमधील अन्य महिलांनाही अशा प्रकारे पुरुष नेत्यांकडून त्रास होतो का, याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी दुजोरा दिला.
हे ही वाचा:
पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची दहशतवादी संघटना लश्करचा हात
पंतप्रधान मोदी यांचा अर्ज भरताना राष्ट्रपती उपस्थित असल्याचे खोटे ट्वीट
विजय वडेट्टीवार यांचा निवडणूक प्रचार करण्याचा अधिकार काढून घ्यावा!
गुजरातमधून अटक केलेला मौलवी ओवेसीचा अनुयायी, इंडोनेशिया-कझाकस्तानमधील कट्टरपंथीयांच्या संपर्कात
ज्या मुली प्रियांका गांधी यांच्यासाठी काम करत होत्या, त्यातील एका कार्यकर्तीला पक्ष कार्यालयातच मारहाण करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारे प्रियंका चतुर्वेदी, अंकिता दत्ता आणि अर्चना गौतम यांसारख्या महिलांबाबत काँग्रेस पक्षात अभद्र वर्तन होत आहे मात्र कोणीच याबाबत बोलत नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, याबाबत पुढे काय करायचे, याचा लवकरच ते निर्णय घेतील.