आज नाशिकमध्ये झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या विकासावर भाष्य करत त्यांच्यावर विरोधकांनी केलेल्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. महायुती सरकारच्या काळात नाशिक जिल्ह्यात तब्बल ५७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून, यामुळे शहरासह ग्रामीण भागात विकासाला मोठी चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उद्योगस्नेही धोरणे, एकाच खिडकीतून मंजुरी व्यवस्था, सक्षम रस्ते-जाळे, वीज आणि पाणीपुरवठा यामुळे नाशिक हे गुंतवणूकदारांसाठी आकर्षक केंद्र बनले आहे. या गुंतवणुकीतून नवे औद्योगिक प्रकल्प, लॉजिस्टिक्स हब, अन्नप्रक्रिया आणि उत्पादन क्षेत्र उभे राहत असून, त्यातून हजारो स्थानिक तरुणांना थेट व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. नाशिकचा आर्थिक कणा अधिक मजबूत करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
मैथिली ठाकूर यांचा मुंबईत रोड शो
एलन मस्क करणार ‘एक्स’चा नवा अल्गोरिदम सार्वजनिक
भारत अमेरिकेवर फारसा अवलंबून नाही; इतर पर्याय उपलब्ध
एस. जयशंकर यांनी फ्रान्स व लक्झेंबर्ग दौऱ्यात कशावर भर दिला?
गोदावरी नदीच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गोदावरीचे शुद्धीकरण, संवर्धन आणि सौंदर्यीकरण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, घाटांचे पुनरुज्जीवन आणि नदीकाठ स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येत असून, गोदावरीचा प्रवाह आणि पवित्रता जपली जाईल, असे त्यांनी सांगितले.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, कुंभमेळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो नाशिकच्या पर्यटन व अर्थव्यवस्थेला चालना देणारा भव्य उत्सव आहे. कुंभमेळ्यासाठी रस्ते, घाट, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, भाविकांसाठी सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध केल्या जातील.
एमआयडीसीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, नाशिक एमआयडीसीचा विस्तार वेगाने सुरू असून, नव्या उद्योगांमुळे शहरासोबतच ग्रामीण भागातही रोजगाराच्या संधी वाढतील. सर्वांगीण, संतुलित विकास साधण्याचा महायुती सरकारचा ठाम निर्धार असल्याचे त्यांनी या सभेत पुनरुच्चार केला.







