माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या कन्या आणि माजी काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एका लेखात दावा केला आहे की, त्यांच्या दिवंगत वडिलांचे मत असे होते की, नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले असे पंतप्रधान आहेत, ज्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जनतेकडून थेट जनादेश मिळाला. त्यांनी लिहिले की, पंतप्रधान मोदींपूर्वी जवाहरलाल नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत कोणताही पंतप्रधान थेट पंतप्रधान म्हणून निवडला गेला नव्हता. त्यांची निवड त्यांच्या पक्षाने किंवा निवडणुकांनंतरच्या आघाडीच्या समीकरणांनुसार करण्यात आली होती.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिले, “भारताचे सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान या विषयावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मला माझे दिवंगत वडील प्रणब मुखर्जी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक विजयाबाबत केलेले एक महत्त्वाचे निरीक्षण आठवते. त्या वेळी बाबा भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. वेगवेगळ्या राजकीय विचारसरणी असूनही दोघांमध्ये चांगले संबंध होते, हीच खरी लोकशाहीची ओळख आहे.”
त्या पुढे लिहितात की, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात प्रणब मुखर्जी यांची भेट घेण्यासाठी गेले. चर्चेदरम्यान प्रणब मुखर्जी यांनी त्यांना निकालाचे विश्लेषण विचारले. त्यावर मोदी यांनी उत्तर दिले की, तब्बल तीन दशकांनंतर एखाद्या राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर बाबांनी त्यांच्या खास प्राध्यापकांच्या शैलीत विचारले, “आणखी काय?” मोदीजी काही बोलले नाहीत, तेव्हा बाबांनी सांगितले की, २०१४ ची लोकसभा निवडणूक इतिहासात वेगळी ठरली कारण या निवडणुकीत प्रथमच पंतप्रधानपदासाठी एका नव्या चेहऱ्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.
लेखानुसार, भाजपला मिळालेला प्रचंड जनसमर्थन हा केवळ पक्षासाठी नव्हता, तर पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावालाही स्पष्ट जनादेश होता. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिले की, यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाचा चेहरा अधिकृतपणे जाहीर केला जात नसे किंवा निवडणुकीनंतर निवडून आलेले खासदार अथवा आघाडीतील पक्ष मिळून नेत्याची निवड करत असत.
त्या पुढे लिहितात की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे जननेते नव्हते आणि त्यांची निवड तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदासाठी केली होती. तसेच पी. व्ही. नरसिंह राव आणि एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधान होताना संसद सदस्य नव्हते, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, २०१४ ची निवडणूक भारतीय राजकारणात असा बदल घडवून आणणारी होती की, मतदारांनी जवळपास राष्ट्रपती पद्धतीप्रमाणे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून जनादेश दिला.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिले की, २०१४ पूर्वी नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात तुलनेने नवीन होते. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती, परंतु २०१४ ही त्यांची पहिली लोकसभा निवडणूक होती. त्यांनी याला अभूतपूर्व म्हटले असून प्रथमच एखादी व्यक्ती पहिल्यांदाच खासदार बनून थेट पंतप्रधान झाली, असे नमूद केले. संसद भवनाच्या पायऱ्यांवर वाकून प्रणाम करतानाचा पंतप्रधान मोदी यांचा फोटो कोट्यवधी भारतीयांच्या मनाला भिडला, असेही त्यांनी लिहिले.
माजी राष्ट्रपतींच्या कन्येने लिहिले की, कोणतीही निवडणूक एका कारणामुळे जिंकली जात नाही. ती अनेक घटकांशी संबंधित गुंतागुंतीची प्रक्रिया असते. भाजपची मजबूत संघटनात्मक रचना, विविध जाती आणि समाजघटकांपर्यंत सातत्याने पोहोचण्याची रणनीती, चुका लवकर ओळखून त्यात तातडीने सुधारणा करण्याची तयारी – या काही प्रमुख गोष्टींमुळे भाजप आज अशी निवडणूक जिंकणारी ताकद बनली आहे, ज्याला सध्या रोखणे कठीण वाटते.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंनी दिलेली चांदीची वीट गायब नाही…ती सुरक्षितच!
सबरीमला मंदिरातील साडेचार किलो सोनं गायब
रशिया-युक्रेनमध्ये १६०-१६० युद्धकैद्यांची अदलाबदल
मात्र, पंतप्रधान मोदी यांचा चेहरा हा भाजपचा सर्वात मोठा राजकीय तुरुपाचा पत्ता असल्याचे नाकारता येणार नाही. लोक त्यांच्याकडे स्वतःच्या कर्तृत्वावर आणि कठोर परिश्रमाच्या बळावर पुढे आलेला मजबूत नेता म्हणून पाहतात, काँग्रेसप्रमाणे घराणेशाही किंवा काही प्रादेशिक पक्षांप्रमाणे कौटुंबिक वर्चस्वाच्या बळावर नव्हे. एका अर्थाने मोदी हे भाजपचे समानार्थी बनले आहेत.
त्या पुढे लिहितात, “मी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांबाबत पश्चिम बंगालमधील माझ्या मित्रांसोबत झालेल्या काही चर्चेचा उल्लेख करू इच्छिते. माझे काही नातेवाईक अजूनही काँग्रेसचे कट्टर समर्थक आहेत आणि राज्यातील काँग्रेसच्या केवळ २.९ टक्के मतांमध्ये त्यांचा वाटा होता. मात्र, माझे बहुतेक मित्र आणि परिचित भाजपला मतदान करणार असल्याचे सांगत होते. निवडणुकीपूर्वी मी त्यांना विचारायचे की, ते कोणत्या पक्षाला मतदान करणार? बहुतेकांचे उत्तर असे असायचे – ‘आम्ही मोदींना मतदान करणार.’ मी त्यांना आठवण करून द्यायचे की, ही विधानसभा निवडणूक आहे आणि मोदी उमेदवार नाहीत. त्यावर त्यांचे कायम एकच उत्तर असायचे – ‘ओई एक-ई व्यापार’ (म्हणजेच, गोष्ट तीच आहे).”
त्या पुढे लिहितात की, नरेंद्र मोदी हे केवळ भारताचे सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान नाहीत, तर स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात प्रभावी पंतप्रधानांपैकी एक आहेत. आघाडी सरकारच्या मर्यादांपासून बऱ्याच प्रमाणात मुक्त राहून त्यांनी तुलनेने स्थिर सरकार दिले आहे.
शर्मिष्ठा मुखर्जी शेवटी लिहितात, “कोणी त्यांच्या अनेक धोरणांशी किंवा काम करण्याच्या पद्धतीशी सहमत नसू शकते आणि लोकशाहीत ते पूर्णपणे स्वाभाविक आहे. परंतु त्यांच्या करिष्म्याला किंवा ‘आकांक्षी भारतासाठी’ प्रेरणास्थान म्हणून भारतीय मतदारांशी असलेल्या त्यांच्या नात्याला कोणीही नाकारू शकत नाही. हे २०१९ आणि त्यानंतर २०२४ च्या निवडणुकांमध्येही स्पष्टपणे दिसून आले. तुम्ही मोदींना पसंत करा किंवा नापसंत, पण ‘ब्रँड मोदी’कडे दुर्लक्ष करू शकत नाही. मोठ्या शक्तीसोबत मोठी जबाबदारीही येते. एक सामान्य नागरिक म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की, जनतेकडून मिळालेल्या या प्रचंड जनादेशाला ते पूर्ण न्याय देतील आणि आपल्या देशाला आणखी उंचीवर घेऊन जातील.”







