महाराष्ट्रात दंगल घडवण्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आणि आणखी दोन जण अशी तीन जणांमध्ये १३ ऑगस्ट २००४ या दिवशी ‘मातोश्री’मध्ये बैठक झाली होती. तीन जणांमध्ये झालेल्या या बैठकीत १९९२- ९३ मध्ये जशा दंगली घडल्या तशा दंगली घडवण्याची योजना आखण्यात आली होती. चर्नीरोड आणि दक्षिण मुंबईतील काही भागांमधील मुस्लिम फेरीवाल्यांवर हल्ला करण्याची योजना होती आणि पुढे दंगल भडकवण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी स्वतः घेतली होती, असा गौप्य्स्फोट नितेश राणेंनी केला आहे.
शिवाय, केलेला आरोप खरा आहे की खोटा हे उद्धव ठाकरेंनी सांगावं, असं आव्हान देखील दिल आहे. तसेच बैठकीत उपस्थित असलेले संबंधित खासदार आणि माजी सरचिटणीस यांना समोर आणून उद्धव ठाकरेंना विचारू शकतो की हे खरं आहे का?, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे.
गेल्या नऊ महिन्यांपासून राज्यात घडत असलेल्या दंगलींमागे उद्धव ठाकरेंचा हात आहे का? हे गृह विभागाने तपासावे. छत्रपती संभाजी नगर आणि मालवणीमध्ये घडलेल्या दंगलींमागे यांचा हात आहे का? मुख्यमंत्री पदासाठी जनतेला वेठीस ठेवायला उद्धव ठाकरेंना जमतं. उद्धव ठाकरे हे अतिशय कपटी असून राज्यात घडत असलेल्या दंगलींमध्ये उद्धव ठाकरेंचा हात असू शकतो, अशी सडकून टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका केली होती. भाषण माफिया असल्याचे राऊत यांनी भाजपाबद्दल वक्तव्य केले होते. संजय राऊत किती मोठे भूमाफिया आहेत हे जनतेला सांगू का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांना अलिबागमधील किहीम बीचजवळ रिसॉर्ट बांधायचा म्हणून एक प्लॉट हवा होता. तेव्हा संजय राऊत यांनी मराठी कुटुंबीय शिरकर यांच्याकडून कवडीमोल भावात जमीन विकत घेतली. भांडुप, विक्रोळीमध्ये आर नावाने सुरू होणाऱ्या बिल्डरसोबतच्या भागीदारीतून किती भूखंड गिळले हे सांगू का? असे सवाल विचारात नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीका केली.
हे ही वाचा:
इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान पेटला!
ईडी म्हणते, ‘मनी लाँड्रिंग प्रकरणात परब यांची चौकशी आवश्यक’
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात ५० लाख डॉलर्सचा दंड
कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान, कर्नाटकमधील ‘हा’ समज बदलणार?
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांनी मराठी माणसाला लुटलं. या प्रकरणात संजय राऊतांची अद्याप सुटका झालेली नाही ते जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे बेळगावमधील मराठी जनतेला विनंती आहे की, अशा चपट्या पायाच्या घरफोड्या माणसाचे काही ऐकू नये आणि त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असं नितेश राणे म्हणाले. यावेळी नितेश राणेंनी संजय राऊतांचा उल्लेख कैदी नंबर ८९५९ असा केला.
महाविकास आघाडी एकत्र ठेवायची आहे ना मग संजय राऊत असे अग्रलेख का लिहितात? काही दिवसांपासूनच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पहा. संजय राऊतांना पत्रकाराने राष्ट्रवादीमध्ये जाणार का यासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर त्यावर त्यांनी उत्तर दिलेलं नाही. लवकरच याची ब्रेकिंग न्यूज मिळेल कारण संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या वाटेरवर आहेत, अशी सडकून टीका नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केली आहे.