भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी राज्यातील घराणेशाहीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, सत्तेसाठी आसुसलेले लोक केवळ आपल्या कुटुंबाचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करतात, तर आमचे सरकार सर्वसमावेशक विकासासाठी काम करत आहे. परिवार का साथ, परिवार का विकास हाच त्यांचा मूलमंत्र आहे.
बिहारमधील सिवान येथे विकास प्रकल्पांना (मूल्य रु. १०,००० कोटी) समर्पित करताना घेतलेल्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी मतदारांना आवाहन केलं की, आगामी निवडणुकीत त्यांनी ‘जंगल राज’ आणणाऱ्या आणि बिहारची लूट करणाऱ्यांना सत्तेच्या बाहेर फेकून द्यावं. ते म्हणाले, आम्ही म्हणतो – ‘सबका साथ, सबका विकास’, पण राजद आणि काँग्रेस म्हणतात – ‘परिवार का साथ, परिवार का विकास’. काँग्रेसच्या लायसन्स राजमुळेच भारतात गरिबी आली. त्यांच्या नेत्यांच्या कुटुंबांनी संपत्ती कमावली, पण सामान्य लोक मात्र गरीबच राहिले,” असं मोदी म्हणाले.
“दलित आणि मागासवर्गीय हे याचे सर्वात मोठे बळी ठरले आहेत,” असंही मोदी यांनी स्पष्ट केलं.
तेजस्वी यादव यांचे घराणेशाहीचे आरोप फेटाळताना, पंतप्रधान मोदी यांनी उलट राजदवर टीका करत म्हटले की, राजद नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे आणि बिहारची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेश पोलिसांनी ८ वर्षांत २३४ अट्टल गुन्हेगारांना धाडले यमसदनी
तेलंगणात १२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण!
एअर इंडिया अपघातातील २२० डीएनए नमुने जुळले; २०२ मृतदेह कुटुंबीयांना सोपवले
डॉ. केशव बळीराम हेडगेवार; राष्ट्रभक्ती, शिस्त आणि आत्मबलिदानाचे प्रतीक
पाच महिन्यांतील पाचवी बिहार भेट
गेल्या पाच महिन्यांत ही पंतप्रधान मोदींची बिहारमधील पाचवी भेट होती. भाजपा-जदयू युती राजद-नेतृत्त्वाखालील महागठबंधनविरुद्ध सत्तेच्या लढतीत उतरली आहे. सिवान, गोपाळगंज, छपरा ही जिल्हे राजदची बालेकिल्ले मानली जातात.
स्थलांतर मुद्दा देखील उचलला
राजद-काँग्रेस आघाडीवर “बिहारविरोधी आणि गुंतवणूकविरोधी” असल्याचा आरोप करत मोदी म्हणाले की, “या लोकांनी एवढं लुटलं की, बिहारसाठी गरिबी ही एक शाप ठरली. जेव्हा हे लोक विकासाबद्दल बोलतात, तेव्हा लोकांच्या डोळ्यांसमोर फक्त बंद पडलेली दुकाने, उद्योगधंदे आणि अपूर्ण पायाभूत सुविधा येतात. हे लोक माफिया राज, गुंडाराज आणि भ्रष्टाचाराला पोसणारे आहेत,” असं मोदी म्हणाले.
बिहारमध्ये सर्वाधिक आंतरराज्य स्थलांतर करणाऱ्या मजुरांची संख्या असल्याचा मुद्दा उचलून, मोदींनी पूर्वीच्या राजद सरकारला जबाबदार धरलं. “काँग्रेस आणि राजद ही बिहारच्या दारिद्र्याची आणि स्थलांतराची मूळ कारणे आहेत. ‘पंजा’ (काँग्रेस) आणि ‘लालटेन’ (राजद) यांनी मिळून बिहारचा अभिमान घायाळ केला आहे. ज्यांनी ‘जंगल राज’ आणलं, ते पुन्हा तसंच काहीतरी करायला संधी शोधत आहेत. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून सावध व्हा,” असा इशाराही त्यांनी दिला.
