शिवसेना पक्षाचा काल ५९ व्या वर्धापन दिन पार पडला. वर्धापन दिनानिमित्त शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एनएससी डोम, वरळी येथे शिवसेना शिंदे गटाचा तर षण्मुखानंद हॉल येथे उबाठा गटाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर टीका टिप्पणी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांच्यावरही टिप्पणी केली. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देत जोरदर टीका केली आहे. उबाठा गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलताच होती, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
मंत्री बावनकुळे म्हणाले, जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात. तेच आज त्यांनी केलं. “शिवसेना संपली नाही” म्हणत असताना, स्वतःतर ‘सेना’ गमावलीच, पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभही सोडून उद्धवजी तुम्ही सोनिया चरणी नतमस्तक झालात. पंतप्रधान मोदीजी-अमितभाई- देवेंद्रजी यांच्यावर वैयक्तिक आरोप करणं सोपं आहे, पण हे नेते जेव्हा देशभर,राज्यभर दौरे करत होते, तेव्हा उद्धवजी मातोश्रीतून ऑनलाईन भाषण करत होते. हे महाराष्ट्रातील जनतेनं बघितलेलं आहे. जे ‘मुंबई आमची’ म्हणतात, त्यांनी आधी सांगावं की, मुंबईतल्या मराठी माणसाचं काय केलं?, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, महापालिकेत सत्ता असतानाही त्यांच्या झोपड्या, पाण्याच्या योजना, शिक्षण, आरोग्य यावर काही केलं का?” मुंबईकरांसाठी कोस्टल रोड, मेट्रो, क्लस्टर रिडेव्हलपमेंट, झोपडपट्टी पुनर्वसन योजना या देवेंद्रजींच्या पुढाकारानं झाल्यात हे मुंबईकरांना माहित आहे. मुंबई आमची आहे, हे तुम्ही ओरडून सांगत राहा, पण विकास, सुरक्षितता आणि सन्मान हवा असेल, तर मुंबईवर भाजपा- महायुतीचाच झेंडा फडकला पाहिजे हीच मुंबईकरांची इच्छा आहे.
हे ही वाचा :
इस्रायल-इराण संघर्षात अमेरिका सामील होणार?, ट्रम्प दोन आठवड्यात घेणार निर्णय!
तेलंगणात १२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण!
पंतप्रधान मोदी दोन दिवसांत तीन राज्यांचा करणार दौरा!
पाकिस्तानची नवी कबुली; सौदी राजपुत्राने सांगितले, भारताला युद्ध थांबवण्याची विनंती करा!
उद्धवजी, तुम्ही अशीच गरळ ओकत रहा, टिंगल- टवाळी करीत रहा, टोमणे मारीत रहा. तुमचे पुढील आयुष्य यातच जाणार आहे. लोकसेवा आणि लोककल्याणासाठी मनात तळमळ असावी लागते, ती तुमच्यात नाही. ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला यापूर्वीच कळलेली आहे. आता पुढील निवडणुकांमध्ये जनता त्यावर शिक्कामोर्तब करणार आहे, असे मंत्री बावनकुळे म्हणाले.
उबाठा गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलताच होती. जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात. तेच आज त्यांनी केलं.
“शिवसेना संपली नाही” म्हणत असताना, स्वतःतर ‘सेना’ गमावलीच, पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभही…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 20, 2025
