काँग्रेसने अखेर रायबरेली आणि अमेठीतील आपल्या उमेदवारीबाबतचे रहस्य उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उघड केले आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी तर, अमेठीतून किशोरीलाल शर्मा रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसने शुक्रवारी त्यांच्या नावांची यादी जाहीर केली.
अमेठी आणि रायबरेली हे दोघेही काँग्रेसचे गड राहिले आहेत. मात्र राहुल गांधी यांना सन २०१९मध्ये भाजपनेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पराभवाची धूळ चारली होती. राहुल गांधी आणि केएल शर्मा हे दोघेही आज, उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या दोन्ही मतदारसंघांत २० मे रोजी निवडणुका होणार आहेत. सात टप्प्यांपैकी पाचव्या टप्प्याची निवडणूक येथे होत आहे.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने घेतलेल्या बैठकीत राहुल गांधी यांना रायबरेलीतून तर, केएल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारीचा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेसने ‘एक्स’वर जाहीर केले. काँग्रेसचे निष्ठावान असणारे केएल शर्मा हे भाजपच्या स्मृती इराणी यांच्याशी दोन हात करतील. तर, रायबरेलीत भाजपने दिनेश प्रताप सिंह यांना मैदानात उतरवले आहे.
दिनेश सिंह सन २०१९मध्ये या मतदारसंघातून सोनिया गांधी यांच्या विरोधात पराभूत झाले होते. काँग्रेस शर्मा हे गांधी कुटुंबीयांचे एक सदस्य असून ते नक्कीच निवडणूक जिंकतील, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे. ‘ही निराशाजनक बाब नाही. ते नक्कीच अमेठीतून जिंकतील. केएल शर्मा हे गांधी कुटुंबीयांचाच एक भाग आहेत. ते अमेठीत गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून काम करत आहेत,’ असे यादव म्हणाले.
हे ही वाचा:
शेवटच्या चेंडूवर हैदराबादचा विजय
इंदोरमध्ये लव्ह जिहाद; मुलीला अडकवण्यासाठी विवाहित शाहरूख शेख झाला यश जैन
दुबईला पुन्हा मुसळधार पावसाचा फटका
गांधी यांच्या अनुपस्थित अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांची जबाबदारी केएल शर्मा यांच्याकडेच असते. गांधी यांची उमेदवारी जाहीर होताच, राहुल गांधी यांच्या रोडशोच्या तयारीला वेग आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेदेखील रायबरेलीत येणार आहेत.