पश्चिम बंगालच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडताना दिसत आहे. भाजपचे दिग्गज नेते सुवेंदू अधिकारी हे राज्याचे पहिले भाजप मुख्यमंत्री बनण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत असून, शनिवारी शपथविधी होणार आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल २९४ पैकी २०७ जागांवर विजय मिळवत इतिहास रचला. तब्बल १५ वर्षे सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करत भाजपने बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला. या विजयामागे सुवेंदू अधिकारी यांची आक्रमक रणनीती आणि संघटनशक्ती मोठा घटक मानली जात आहे.
हे ही वाचा:
“सोमनाथ मंदिर म्हणजे आपल्या संस्कृतीच्या अढळ निश्चयाचे प्रतीक”
थलपती विजयशी ‘मैत्री’ काँग्रेसला पडली महागात
क्रिकेटनंतर ‘टॅक्स पिच’वरही महेंद्रसिंह धोनी अव्वल
महुआ मोइत्रा यांच्यासमोर विमानात ‘चोर चोर, टीएमसी चोर’च्या घोषणा
विशेष म्हणजे, सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभव केला. भवानीपूर मतदारसंघात त्यांनी ममता बॅनर्जी यांना १५ हजारांहून अधिक मतांनी हरवले. यापूर्वीही त्यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांना धक्का दिला होता. त्यामुळे भाजपमध्ये त्यांना “जायंट किलर” म्हणून ओळखले जाते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कोलकात्यात भाजपच्या नव्याने निवडून आलेल्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळाल्याचे वृत्त आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात एका महिला नेत्या आणि उत्तर बंगाल किंवा आदिवासी भागातील नेत्याला संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नवीन मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधण्यावर भाजप भर देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवासही अत्यंत रंजक राहिला आहे. त्यांनी सुरुवातीला काँग्रेसमध्ये काम केले, त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक बनले. मात्र २०२० मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर बंगालच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला.
आता सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री झाल्यास पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भाजपचे सरकार सत्तेवर येईल. त्यामुळे बंगालच्या राजकारणात नवे पर्व सुरू होणार असल्याचे मानले जात आहे.







