गुरुवार, 3 जून रोजी महाराष्ट्राचे आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाच टप्प्यात राज्यात अनलॉक होणार असल्याचे सांगितले. तर पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या राज्यातील १८ जिल्ह्यात अनलॉक होणार असल्याची माहिती दिली. पण पुढच्या काही वेळातच राज्य सरकार मार्फत हे स्पष्ट करण्यात आले की राज्यातील कोविड निर्बंध अद्याप हटवले गेले नसून नव्या नियमांचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे. यामुळे राज्यात अजूनही लॉकडाऊन कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकार मधील विसंवादही चव्हाट्यावर आला आहे.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक होणार असल्याची घोषणा गुरुवारी संध्याकाळी केली आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. पण अजून राज्यातील कडक निर्बंध हटवले गेले नसून नव्या नियमांचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे असे स्पष्टीकरण महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आल्यानंतर नागरिकांची निराशा झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात पाच टप्प्यांत अनलॉक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
हे ही वाचा:
बॉलीवूडमधील ४४ पेक्षा कमी वयोगटासाठी पालिकेने आधीच उघडली होती लशीची दारे
अटी-शर्तींसह का असेना पण पुन्हा चित्रिकरणाला परवानगी द्या
शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही
मुंडेसाहेब असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती
कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल असे सांगताना ब्रेक द चेन अंतर्गत काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे असे राज्य सरकारने सांगितले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ५ टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील असे सरकारने स्पष्ट केले आहे. तर जिल्हानिहाय प्रशासनाकडून संपूर्ण आढाव घेऊन अंमलबजावणीचा विचार करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ५ टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 3, 2021
राज्यात टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार होणार. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय होणार आहे-राज्य शासनाचे स्पष्टीकरण
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 3, 2021