साई सुदर्शनच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने श्रीलंका ‘अ’विरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात मजबूत पकड मिळवली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने १ बाद २४७ धावा केल्या असून, संघ अजूनही श्रीलंकेच्या पहिल्या डावापेक्षा ११९ धावांनी पिछाडीवर आहे.
सलामीवीर साई सुदर्शन याने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत आपल्या शानदार फॉर्मची पुन्हा एकदा प्रचिती दिली. त्याने १८४ चेंडूत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०४ धावा केल्या आहेत. त्याला दुसऱ्या टोकाला देवदत्त पडिक्कलची उत्तम साथ लाभली असून, तो १५१ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद ९४ धावांवर खेळत आहे. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत १८१ धावांची अभेद्य भागीदारी उभारली आहे.
भारताला एकमेव धक्का अमन मोखाडेच्या रूपाने बसला. त्याने ४८ चेंडूत ६ चौकारांसह ३८ धावा केल्या. मोखाडे आणि सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी रचली.
याआधी श्रीलंका ‘अ’चा पहिला डाव ३६६ धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेचा कर्णधार सहन अराचिगे याने २०७ चेंडूत १२७ धावांची शानदार शतकी खेळी केली. त्याला नुवानिडू फर्नांडो (४४) आणि अंजाला बंडारा (४२) यांनी चांगली साथ दिली.
भारताकडून गुरनूर बरार आणि सारांश जैन यांनी प्रत्येकी ४ बळी घेत श्रीलंकेचा डाव आवरला, तर यश ठाकूरने २ विकेट्स मिळवल्या.
आता तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारताची नजर श्रीलंकेवर मोठी आघाडी मिळवण्यावर असेल. साई सुदर्शन शतकाचे द्विशतकात रूपांतर करण्याचा प्रयत्न करेल, तर देवदत्त पडिक्कलही शतक पूर्ण करून भारताला भक्कम स्थितीत नेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.







