चाणक्य नगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे नामकरण शुक्रवारी ज्येष्ठ संघकर्मी भाऊराव बेलवलकर यांच्या नावे करण्यात आले. या रस्त्यावर चालणे सोपे आहे परंतु ज्या संघ मार्गावर भाऊराव आयुष्यभर चालले त्या मार्गावर चालणे कठीण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संघकर्मी, संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

भैय्याजी जोशी यांच्या हस्ते या रस्त्याच्या नामकरणाचा सोहळा पार पडला. भाऊराव बेलवलकर रस्ता नामकरण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या रस्त्याच्या नामकरणासाठी कांदिवली पूर्वचे आमदार भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रयत्न केले होते, सौजन्य होते भाऊराव बेलवलकर यांचे पुत्र आप्पा बेलवलकर आणि कुटूंबियांचे. भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
हे ही वाचा:
अंधेरीतील SRA इमारतीला भीषण आग
सायबर जनजागृती मोहिमेला गैरहजर, २ कोटींच्या फसवणुकीला पडले बळी
डावे चळ राज ठाकरेंच्या डोक्यात कसे शिरले?
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

पुरुषोत्तम रामचंद्र तथा भाऊराव बेलवलकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांच्या माध्यमातून संघकार्याचा विस्तार करण्यासाठी निडरपणे ताडदेव, कामाठीपुरा, माझगांव, सात रस्ता, गिरगांव, लालबाग, परळ येथे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन अपरंपार कष्ट घेतले. शिस्तप्रिय कार्यकर्ते, रामजन्मभूमी आंदोलनात झोकून देणारे कार्यकर्ते, आणीबाणीत स्वयंसेवकांची काळजी घेणारे सहृदय संघस्वयंसेवक, उत्तम क्रीडापटू, कुटुंबवत्सल म्हणून ते परिचित होते.

भाऊराव म्हणजे शत प्रतिशत स्वयंसेवक. संघाला पाहिजे ते आणि संघाने सांगितले ते तन मन धनाने करणारे आदर्श स्वयंसेवक. भाऊराव हे मिश्किल स्वभावाचे होते. स्वतःचे नाव ते “पुरा बेलवलकर” असे सांगत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (तेव्हाचा कोल्हापूर जिल्हा) वेंगसर गावी त्यांचा जन्म झाला. नंतर ते कुटुंबासह मुंबईस आले. गिरगावातल्या मारवाडी हायस्कूलच्या पटांगणावर भरणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेशी पुढे त्यांचा संबंध आला. आणि भाऊराव लहानपणीच स्वयंसेवक बनले.
मुंबई महानगराचे प्रचारक शिवरामपंत जोगळेकर यांच्याशी दृढ परिचय झाला आणि ते संघमय झाले. कबड्डी आणि हुतूतूमध्ये भाऊरावांचे प्राविण्य अतुलनीय होते. हातकैची आणि चवडा पकडणे यामध्ये तर भाऊरावांचा हात धरणारा कुणी नव्हता. तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते कबड्डी क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल भाऊरावांचा गौरव करण्यात आला. ते बिनीचे बिलियर्डस व कॅरमपटू देखील होते…
५० वर्षे भाऊराव सातत्याने संघ शिक्षा वर्गात शिक्षक म्हणून गेले. या काळात संघावर बंदी घालून सरकारने भाऊरावांची शिक्षक म्हणून काही वर्षे चुकवली तेवढीच. दंड, खड्ग, वेत्रचर्म हे भाऊरावांचे शारिरीकचे प्राविण्याचे आणि आवडीचे विषय. पुढे खड्गातील नैपुण्यामुळे डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या चाणक्य मालिकेत चाणक्यांना खड्गाचे (तलवार) प्रशिक्षण देणाऱ्या गुरुची भूमिका भाऊरावांनी केली होती, हे विशेष. त्याच भाऊरावांना गोड गळ्याची देणगी लाभली होती. संघाची अनेक पद्ये ते इतक्या सुमधुर आवाजात म्हणत की ऐकत रहावेसे वाटे.
एका बाजूला ही संघ साधना सुरु असताना भाऊरावांनी आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या अत्यंत कुशलतेने पेलल्या. नातेवाईक व आप्तेष्टांच्या गोतावळ्याच्या स्नेहसंबंधामध्ये जराही उणीव भासू दिली नाही. भाऊरावांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या संघ कार्याबद्दल कधीच नाराजी किंवा त्रागा झाला नाही. श्री गुरुजी आणि श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांचा भाऊरावांना अपरंपार स्नेह लाभला.
आणीबाणीच्या काळात कांदिवली पूर्वला संघाचे अनेक भूमिगत असलेले अधिकारी निर्धास्तपणे भाऊरावांकडे निवासाला असत. रामजन्मभूमी आंदोलनात भाऊराव १ महिना अयोध्येत रहायला गेले होते आणि तिथे त्यांच्याकडे विशेष अतिथींच्या निवासाची जबाबदारी होती. केवळ आपणच नाही तर आपली पुढील पिढी संघ कार्यात कार्यरत असावी याची काळजी भाऊरावांनी घेतली. आज त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आप्पा बेलवलकर भाजपा उत्तर मुंबईचे महासचिव आहेत तर. द्वितीय चिरंजीव अण्णा बेलवलकर हे तृतीय वर्ष शिक्षित असून विलेपार्ले येथे संघाचे कार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे कनिष्ठ चिरंजीव दादा बेलवलकर हे दहिसर येथे भाग स्तरावर संघाचे कार्य करीत आहेत.
परमेश्वरी कृपेने दणकट व निरोगी प्रकृती लाभलेल्या तसेच सबकुछ आणि शत प्रतिशत स्वयंसेवक अशा या कर्मठ कार्यकर्त्याच्या कृतार्थ जीवनाची सांगता २८ ऑक्टोबर २००७ रोजी झाली.







