भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनी यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. शांत स्वभाव, अचूक नेतृत्व आणि सामन्याचा शेवट करण्याची अद्वितीय क्षमता यामुळे धोनीने जागतिक क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. ७ जुलै १९८१ रोजी रांची येथे जन्मलेल्या धोनीच्या यशामागे तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली यांच्या एका निर्णयाचा मोठा वाटा मानला जातो.
शालेय जीवनात फुटबॉलमध्ये गोलकीपर म्हणून खेळणाऱ्या धोनीला त्यांचे प्रशिक्षक केशव रंजन बॅनर्जी यांनी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून संधी दिली. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट, भारत ‘अ’ संघ आणि अखेर भारतीय संघापर्यंतचा त्यांचा प्रवास सुरू झाला.
मात्र, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीला धोनीला अपयशाचा सामना करावा लागला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या मालिकेत आणि त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याची बॅट शांत राहिली. सलग अपयशामुळे त्याला संघातून वगळले जाईल, अशी चर्चा सुरू होती.
अशा वेळी तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली यांनी धोनीवर विश्वास कायम ठेवत त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला. पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात धोनीने १२३ चेंडूत १४८ धावांची तुफानी खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची दमदार छाप उमटवली. गांगुलींचा हा निर्णय धोनीच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला.
धोनीने भारतासाठी तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ५३८ सामने खेळत १७,२६६ धावा केल्या. कसोटीत ६, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० शतके त्याच्या नावावर आहेत.
कर्णधार म्हणून धोनीची कारकीर्द अधिकच सुवर्णमयी ठरली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ चा टी-२० विश्वचषक, २०११ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तीन वेगवेगळ्या ICC ट्रॉफी जिंकणारा तो आजही जगातील एकमेव कर्णधार आहे.
धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र, भारतीय क्रिकेटमध्ये त्याने निर्माण केलेला वारसा आजही तितकाच प्रेरणादायी मानला जातो.







