आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या भारताच्या अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर सध्या टीकेची झोड उठली आहे. शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात शमीने आपल्या तीन षटकांच्या स्पेलमध्ये तब्बल अठ्ठेचाळीस धावा दिल्या, ज्यामुळे त्याच्या सध्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या सामन्यात शमीला एकही बळी घेता आला नाही आणि तो हैदराबादसाठी प्रभावी ठरू शकला नाही. आयपीएल २०२४ मध्ये एडीच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर राहिलेल्या शमीकडून या वर्षी मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्याचा आतापर्यंतचा आकडा निराशाजनक आहे — नऊ सामन्यांत केवळ सहा बळी, छप्पन्न पूर्णांक सतरा च्या सरासरीने आणि अकरा पूर्णांक तेवीस च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी.
भारताचे माजी सलामीवीर आणि क्रिकेट विश्लेषक आकाश चोप्रा यांनी शमीच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली आहे. “शमी सध्या लयीत नाही. तो अशा प्रकारचा गोलंदाज आहे ज्याच्या विरुद्ध सहसा षटकार मारणं सोपं नसतं. मात्र गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर सहज फटकेबाजी झाली. हे निश्चितच चिंताजनक आहे,” असं चोप्रा यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
हेही वाचा :
वनडे क्रिकेटच्या अनुभवामुळेच आयपीएलमध्ये गोलंदाजी सुधारली
पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व पोस्टल, पार्सल सेवांवर भारताकडून बंदी
इस्लामाबादच्या आर्थिक कणा मोडण्याचे नियोजन
“हाऊस अरेस्ट” प्रकरणी एजाज खानसह निर्मात्यांवर गुन्हा दाखल
यावर्षी वीस जूनपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी शमीचा सध्याचा फॉर्म भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. ही मालिका नवीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) चक्राची सुरुवात करणार असून, भारताला दोन हजार सात नंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.
चोप्रा म्हणाले, “बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शमीची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवली होती. तिथे बुमराह एकटाच होता. इंग्लंड दौऱ्यावर शमीसारख्या अनुभवी गोलंदाजाकडून अपेक्षा असतील, पण त्याची सध्याची परिस्थिती पाहता ही चिंता वाढवणारी आहे.”